वीज यंत्रणा खिळखिळी; नुसत्या हवेचेही निमित्त
By Admin | Updated: June 4, 2014 01:38 IST2014-06-04T01:38:18+5:302014-06-04T01:38:33+5:30
वीज यंत्रणा खिळखिळी; नुसत्या हवेचेही निमित्त

वीज यंत्रणा खिळखिळी; नुसत्या हवेचेही निमित्त
नाशिक : ग्राहकांना सुरळीत आणि चोवीस तास वीजपुरवठा करावा असे महावितरणवर कायद्यानेच बंधन आहे. असे असतानाही अतिशय मनमानी पद्धतीने ग्राहकांच्या हक्कावार गदा आणली जात आहे. एकीकडे वीजनिर्मिती संचांची पुंगळी झाल्याने सक्तीचे भारनियमन, तर दुसरीकडे पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत होत असल्याने ग्राहक अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. मागील महिन्यातच वीज नियामक आयोगाने ग्राहकांवर लादलेले वाढीव वीजदर ग्राहकांनी निमूटपणे स्वीकारले आणि महावितरणला सहकार्य केले. त्यावेळी ग्राहकांनीच नमते घेतले म्हटल्यावर महावितरणनेही ग्राहकांच्या तिजोरीवर धाड टाकत धडाधड पूर्वलक्षी प्रभावाने वसुलीची बिले पाठवून ती वसूलही केली. वसुलीतील त्यांची ही तत्परता मात्र सेवेतून लुप्त झाली आहे. याकडे सोयीने काणाडोळा करणार्यांमध्ये संचालकांपासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत सार्यांचाच सुरात सूर दिसून येतो. वीज वितरण व्यवस्थेतील दोष वारंवार उघड होऊनही सारे काही सुरळीत असल्याच्या आविर्भावात अभियंते ग्राहकांशी रेटून बोलत असतात. शहरातील वीजपुरवठा यंत्रणा किती खिळखिळी झाली आहे याची प्रचिती शहरवासीय गेल्या दोन आठवड्यांपासून घेत आहेत. तरीही आमचा काही दोषच नसल्याचा पवित्रा घेणारी यंत्रणा किती निर्ढावली आहे हेच यावरून सिद्ध होते. पावसाचा सडा आणि नुसत्या हवेच्या झोक्यानेही संपूर्ण वीज वितरण यंत्रणाच कोलमडून पडत असेल, तर यंत्रणा सुधारण्याच्या नावाखाली साडेतीन कोटींचा खर्च करून साधले काय, याचे उत्तर देण्याचे उत्तरदायित्व महावितरण दाखविल का, असा संतप्त सवाल ग्राहकांच्या मनात आहे. राज्यातील वीजनिर्मिती संच बंद पडल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे हेही मान्य; परंतु भारनियमन करताना ते कसेही आणि कोणतीही सूचना न करता करावे म्हणजे मनमानीच म्हटली पाहिजे. बरे, भारनियमन कधी सुरू झाले आणि कधी संपणार अशी विचारणा करावी तर कॉल सेंटरला याची कोणतीही माहिती नसते. स्थानिक पातळीवर माहिती मागण्याचे जणू अधिकारच काढून घेतल्यासारखी परिस्थिती आहे. विजेची परिस्थिती काय आहे, भारनियमन कसे होणार, किती तास होणार, शहरात कोणत्या भागात तांत्रिक बिघाड आहे, कुठे भारनियमन सुरू आहे याची माहिती स्थानिक पातळीवर मिळू नये आणि त्यातून ग्राहकांचा मनस्ताप होत असेल तर महावितरणने ग्राहकांची अशी अवस्था जाणीवपूर्वक केली की ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही, अशा मग्रुरीत तर मशगुल नसावे? (प्रतिनिधी)