येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:29 IST2016-06-26T22:10:08+5:302016-06-27T00:29:25+5:30
येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई
येवला : येवला शहरास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, १२ दिवस होऊन गेले तरी गंगादरवाजासह चौंडेश्वरी मंदिर परिसरात पाणी आले नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या गंगादरवाजा भागात असणाऱ्या खासगी कूपनलिका व चौंडेश्वरी मंदिराजवळ असलेली पालिकेच्या मालकीची विहीर परिसरातील नागरिकांची तहान भागवत आहे.
गंगादरवाजा भागात १० ते १२ खासगी कूपनलिका आहेत. त्यावरून नागरिक पाणी भरून नेत आहेत. मधली गल्ली परिसरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ जुनी विहीर आहे. या विहिरीवर परिसरातील नागरिक अवलंबून आहेत. पाणीटंचाईच्या काळातदेखील या विहिरीच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना फार टंचाई जाणवली नाही. या विहिरीवर पालिकेने दोन विजेचे पंप बसविलेले आहेत.
या दोन कनेक्शनमधून दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भरली जाते. यातून आवश्यकतेनुसार पाणी नळाद्वारे घेतले जाते. शिवाय काही मंडळींनी विहिरीतून थेट पाईप कनेक्शनने पाणी घरापर्यंत नेल्याची माहिती आहे.
या भागातील पाणीटंचाई निवारण्यास ही विहीर समर्थ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. वापरण्यायोग्य पाणी आहे, परंतु पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अशीच परिस्थिती सर्वदूर शहरामध्ये आहे.
शहराच्या मध्य वस्तीत, पाटीलवाडा, कुक्कर गल्ली,
खंडेराव मंदिर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. नागरिकांना पाणी भरण्यासाठी खड्डे चुकवत महादेव मंदिरासमोरील हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)