संततधार पावसामुळे टमाटा पिकावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:47 IST2020-08-25T16:46:50+5:302020-08-25T16:47:15+5:30
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

संततधार पावसामुळे टमाटा पिकावर संक्रांत
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कोरोनामुळे नर्सर्रीमध्ये बुकिंग करूनही टमाटा रोपे न मिळाल्याने बळीराजाला पीक घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मिळेल त्या ठिकाणाहून रोपे आणून नागपंचमीला बहुसंख्य शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली.
नगदी पीक म्हणून टमाटा पिकाकडे पाहिले जाते. सुरुवातीच्या पावसावर शेतकरीवर्गाने महागडी रोपे आणून अर्ली टमाट्याची लागवड केली. पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होत असतानाच पावसाने दडी मारली. याही अवस्थेत शेतकरीवर्गाने जिवाचे रान करीत पीक वाचविले. पीक ऐन बहरात असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली. सततच्या संततधार पावसाने अर्ली व नूतन लागवड केलेल्या टमाटा पिकावर संक्रांत आली. पिकावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. लहान टमाटा पिकाला बुरशी रोगाने विळखा दिल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. तसेच अर्ली म्हणजे नागपंचमीला लागवड केलेल्या झाडांची वाढ चांगला प्रकारे होत असली तरी झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, फूलकळी गळून पडत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी टमाटा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला आहे. आवक कमी असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळधारणेवर परिणाम झाला असून, शेतकरीवर्गाची आशेची निराशा होण्याचे चित्र दिसत आहे. (२५ लखमापूर १ ते ४)