प्रेक्षकांअभावी माहितीपट मृतप्राय
By Admin | Updated: December 25, 2015 23:50 IST2015-12-25T23:48:49+5:302015-12-25T23:50:33+5:30
प्रेक्षकांअभावी माहितीपट मृतप्राय

प्रेक्षकांअभावी माहितीपट मृतप्राय
नाशिक : या देशात माहितीपट फक्त महोत्सवांपुरते उरले आहेत. केबलचे राज्य आल्यानंतर ते अधिकच दुर्लक्षित झाले असून, लोक हौसेने माहितीपट बनवत असले, तरी त्यांना पाहायला प्रेक्षकच नाहीत. प्रेक्षकांअभावी हे माध्यम मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची खंत प्रख्यात माहितीपट दिग्दर्शक व निर्मात्या निष्ठा जैन यांनी व्यक्त केली.
अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महोत्सवाचे संयोजक भिला ठाकरे, अर्चना भट उपस्थित होत्या. जैन म्हणाल्या, पूर्वी ‘दूरदर्शन’वर माहितीपट दाखवले जात असत; मात्र केबल आल्यानंतर तेही बंद पडले. आता माहितीपट काही महोत्सवांतच पाहायला मिळतात. त्यांना प्रेक्षकही मिळत नसल्याने परिस्थिती वाईट झाली आहे. आपल्या ‘गुलाबी गॅँग’ या माहितीपटाविषयी त्या म्हणाल्या, बॉलिवूडमधील या विषयावरच्या चित्रपटाशी आपल्या माहितीपटाचा काही संबंध नाही. चित्रपट निर्माण करताना त्यांनी आपला माहितीपट पाहिलाही नाही. तो पाहिला असता, तर बरे झाले असते. आपण बुंदेलखंडमध्ये गुलाबी गॅँगसोबत पाच महिने प्रत्यक्ष राहून माहितीपट तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भिला ठाकरे यांनी फिल्म फेस्टिव्हलमागील उद्देश स्पष्ट केला. वंचितांच्या चित्रपटांना स्थान देण्यासाठी हा महोत्सव सुरू केल्याचे ते म्हणाले. श्वेता गाडगीळ व आशिष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवात आज दिवसभरात कावळा, काव्यकल्लोळ, भूक, आमचं गाव आमचं सरकार, कालिख, बालविवाह, उष:काल होता होता आदि सुमारे वीस ते बावीस लघुपट, चित्रपट सादर करण्यात आले. उद्या सकाळी १० पासून रात्री ९.३०पर्यंत सुमारे २८ चित्रपट दाखवले जाणार आहेत.