संसार बहरण्यापूर्वीच भंगले स्वप्न
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30
मालेगाव : सूर्यनारायणाचा प्रकोप आणि व्यवस्थेने त्याचा बळी घेतला.

संसार बहरण्यापूर्वीच भंगले स्वप्न
मालेगाव : नुकतेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेले, नवीन संसार अधिक बहारदार कसा करता येईल, आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या स्वत:च्या घराला कसे सावरता येईल या विचाराने दिवसरात्र तो काबाडकष्ट करून पोलीस भरतीची तयारी करत होता. त्यानुसार पोलीस भरतीसाठी तो मुंबईत गेलाही. पण... दुर्दैव पोलीस खात्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिलेच. सूर्यनारायणाचा प्रकोप आणि व्यवस्थेने त्याचा बळी घेतला.
येथील द्याने भागातील गणेशनगर भागात राहणाऱ्या अंबादास बबन सोनवणे या २३ वर्षीय तरुणाची ही कहानी. दोनच दिवसांपूर्वी अंबादास हा शहर परिसरातील आपल्या जवळपास २० मित्रांसह मुंबईत पोलिस भरतीसाठी गेला. तेथे गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भरतीसाठी सर्व मित्र पांगले.
अंबादास स्वत: विक्रोळी येथे गेला. दिवसभर तेथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असताना भरतीदरम्यान अतिथकवा, अतिउष्मा व सोबत पोलीस प्रशासनातर्फे पोलीस भरतीसाठी राबविण्यात येत असलेली ढिसाळ प्रक्रिया याचा अंबादास बळी ठरला.
अंबादासच्या घरी ही बातमी कळताच प्रथमत: त्यांचा विश्वास बसेना. सदर बातमी सांगणाऱ्यास त्यांनी नावात काही चूक असेल असे म्हणत समोरच्याची व आपल्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने ही बातमी खरी होती.
पतीनिधनानंतर प्लास्टीक गिट्टी कारखान्यात काम करून अंबादासच्या आईने मोठ्या धिराने कुटुंबाचा गाडा हाकलला होता. तीन मुलींच्या लग्नापाठोपाठ तिघा मुलांचीही लग्ने केली. अंबादास हा सर्वात लहान. पोलीस होऊन कुटुंबाला सावरण्याचे, मोठा आधार देण्याचे अंबादासचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. सकाळी मुंबईहून त्याचे पार्थिव मालेगावी आणल्यानंतर द्याने स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)