गृहविलगीकरणातील रुग्णांच्या कचऱ्याची होतेय सरमिसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:46+5:302021-04-15T04:13:46+5:30
शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. मार्च महिन्यात तर त्याचा कहर झाला आणि ही संख्या कैकपटीने वाढली. एप्रिल महिन्यात ...

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या कचऱ्याची होतेय सरमिसळ
शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. मार्च महिन्यात तर त्याचा कहर झाला आणि ही संख्या कैकपटीने वाढली. एप्रिल महिन्यात तर घरटी तीन ते चार रुग्ण आढळत आहेत. अत्यंत वेगाने संसर्ग वाढत आहे. मात्र, नाशिक शहरात अन्य जिल्ह्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणात येत असल्याने रुग्णालयांमध्येच आता जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता गृहविलगीकरणाशिवाय रुग्णांना पर्याय राहिलेला नाही. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आता उपचाराधीन रुग्णांची संख्या २१ हजारापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यातील सुमारे ८५ टक्के म्हणजे १८ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घरीच स्वतंत्ररीत्या उपचार घेत आहेत. त्यांचे वापरलेले मास्क आणि अन्य कचरा संसर्गाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने प्रत्येक विभागात एक या प्रमाणे स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था केली आहे. कोरोनाबाधितांची दररोज यादी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय विभाग ती घनकचरा विभागाकडे सुपुर्द करते आणि त्यानंतर घंटागाडी चालकांना ती दिली जाते त्यानुसार रुग्णाच्या घरी पीपीई किट घालून कर्मचारी हा कचरा संकलित करतात. त्यानंतर तो पाथर्डी शिवारात खत प्रकल्पावर पाठवला जातो. तेथे एका भट्टीत हा कचरा नष्ट केला जातो. अर्थात अनेक नागरिक अशाप्रकारचा कचरा नियमित घरगुती कचऱ्यातदेखील टाकत असल्याने महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा धोका वाढला आहे.
इन्फो...
कचऱ्यापासून कोरोना पसरू शकतो..
१) कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय कचऱ्यापासून कोरोना संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे त्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
२) सध्या मास्क हा सर्वाधिक संवेदनशील आणि घातक कचरा ठरू शकतो. वापरलेला मास्क कुठेही फेकला गेल्यास त्यातून तो संसर्ग वाढू शकतो.
३) गृहविलगीकरणातील रुग्णांचा हाच कचरा असतो. यापलीकडे गोळ्यांच्या पाकिटापलीकडे काहीच नसते. त्यामुळे अन्य साधने धोकादायक नाही.
४) घातक कचरा म्हणजेच मास्क किंवा पीपीई किट कचऱ्यात मिळाल्यानंतर सेाडियम सेाल्युशन्समध्ये टाकला जातो. त्यानंतर खत प्रकल्पावरील भट्टीत तो जाळला जातो.
कोट...
गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या कचऱ्यासाठी महापालिकेने सहा विभागात सहा स्वतंत्र घंटगाड्यांची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या घरी पीपीई किट घालून कर्मचारी जातात आणि सुरक्षितपणे हा कचरा संकलित करतात. खत प्रकल्पावर हा कचरा भट्टीत जाळला जातो.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन
इन्फो..
८०० कचरा संकलन करणारे घंटागाडी कर्मचारी
२०० टन ओला कचरा
४०० टन सुका कचरा
इन्फो....
शहरातील एकूण रुग्ण- १,४५,०६५
बरे झालेले रुग्ण- १,२३,३४२
उपचार घेत असलेले रुग्ण- २०,४४२
गृहविलगीकरणातील रुग्ण- १८,७७६