काम अर्धवट असल्याने गैरसोय
By Admin | Updated: August 2, 2016 01:00 IST2016-08-02T00:59:54+5:302016-08-02T01:00:30+5:30
ओझर : महामार्ग ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात

काम अर्धवट असल्याने गैरसोय
ओझर : महामार्गालगत असलेल्या ओझर परिसरातील नागरिकांना वेगवान वाहनांच्या गतीमुळे रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. अजून किती दिवस ओझरकारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे. अनेक वर्षांपासून अर्धवट असलेले महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असल्यामुळे हा धोका कायम आहे.
ओझर पूर्वी एक गाव होते. परंतु आता आजूबाजूला उदयास आलेली सर्व नगरे पाहता आता ओझर गावाने उपनगराकडे झेप घेतली आहे. यातील शेकडो नागरिक हे महामार्गाच्या दोन्ही बाजूने गावात ये-जा करतात.
ओझरची मुख्य वस्ती गावाच्या पलीकडे आहे. त्यामध्ये एरफोर्स स्टेशन आर.के. कॉलनी लोहिया नगर, शिवाजी नगर, संजीवनी नगर, दत्तनगर, रावसाहेब कॉलनी, चौरे मळा आदिंचा समावेश आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास महामार्ग ओलांडूनच गावात यावे लागते. सध्या सायखेडा फाटा ते पाटील संकुलपर्यंत जुन्या रस्त्यावरून वाहने ये-जा करतात कारण , इथली जी काही मंजूर कामे आहेत ती लाल फितीत अडकली आहेत. सायखेडा फाटा परिसरात तर रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवायचे की आडव्या जाणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज घायचा या विचारांमध्ये वाहनचालक असतात. यामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक जीव गेले. यापुढे शेतकऱ्यांची ये-जा असलेले खंडेराव मंदिर परिसर तर सध्या धोकादायक बनले आहे. कारण या मंदिराशेजारी असलेल्या शाळेतील विद्यार्र्थी तर महामार्ग पोलिसांच्या मदतीशिवाय ओलांडूच शकत नाही. तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ हीच परिस्थिती आहे. गावात मंगळवारी आठवडे बाजार असतो. यासाठी ओसंडून रस्त्यावर ओसंडून गर्दी वाहत असते. वाहनांची भररस्त्यात केलेली पार्कींग अपघाताला आमंत्रण देणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी येथे मोठा अपघात झाला होता. यात मालेगावच्या पाच लोकांना प्राण गमवावे लागले होते. गडाख कॉर्नर परिसरात अशीच परिस्थिती आहे. ओझर गावात सर्वात मोठा दुचाकी वाहनांचा बाजार भरतो. या बाजाराच्या मागे मोठी वसाहत आहे. एरफोर्सला ये-जा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. पाटील संकुल येथील कामगार थोडे विरु द्ध दिशेस येऊन महामार्ग ओलांडून कामावर जातात. सतत प्रवाशांची रेलचेल असूनही सर्व्हिस रोड पूर्ण झालेला नाही. संपूर्ण जुन्या रस्त्याला तर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. अलीकडे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अजून किती दिवस ओझरकारांनी सहन करावं? महामार्ग प्राधिकरणला अजून जाग कशी आलेली नाही, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)