दिंडोरी तालुका म्हणजे महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया: दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:37 IST2021-06-26T00:36:39+5:302021-06-26T00:37:44+5:30
प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काढले.

मोहाडी येथे राज्यस्तरीय कृषी कार्यशाळेत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत व्यासपीठावर व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, धनराज महाले, सुनील पाटील, संजय बनकर, सुरेश डोखळे, प्रवीण जाधव, आयुक्त धीरजकुमार आदी.
दिंडोरी : प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काढले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा मोहाडी येथील कर्मवीर एकनाथ जाधव यांच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जि. प. कृषी विभाग सभापती संजय बनकर, सुरेश डोखळे, माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, आयुक्त धीरजकुमार, संजय पडोळ, दशरथ तांभाळे, रवींद्र शिंदे, विवेक सोनवणे, सुनील वानखेडे, राजेंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
दादा भुसे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने कृषीविषयक घेतलेल्या तीन विधेयकांत सुधारणा होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे एखाद्या व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे तत्काळ काढून शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. आपण त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचेही भुसे यांनी सांगितले. प्रास्ताविक किसन मुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विभागीय अधीक्षक सुनील वानखेडे यांनी केले.
राज्यभरात थेट प्रक्षेपण
कार्यशाळेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्गदर्शन व शेतकऱ्यांचे मनोगत आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी डॉ. केदार थेपडे (जळगाव), प्रशांत वाघमारे (अपेडा), किरण डोके (सोलापूर), स्वप्नील पाटील (देवळा), विशाल अग्रवाल (जळगाव) यांनी आपल्या मनोगतातून येणाऱ्या अडचणी व आपल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव कथन केले. यावेळी वंदना जाधव (निफाड) अनंत पाटील (जळगाव) यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.