सायंकाळीही हॉटेल्स खुली ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:54 IST2021-06-17T00:02:07+5:302021-06-17T00:54:02+5:30
येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सायंकाळीही हॉटेल्स खुली ठेवण्याची मागणी
येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. या व्यवसायावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. काही हॉटेल्स बंद पडली असून अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. निर्बंधात आता शिथिलता आली असून हॉटेल व्यवसायासही परवानगी मिळाली आहे. हॉटेल व्यवसायासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. परंतु बहुतांश हॉटेल, खानावळ यांचा व्यवसाय सकाळ बरोबरच सायंकाळचा असल्याने सायंकाळी ६ ते १० या वेळेत हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी मिळावी. सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन हॉटेल व्यवसायासाठी सायंकाळीदेखील परवानगी दिल्यास नियम-अटींसह व्यवसाय करण्यास हॉटेल व्यावसायिक तयार असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश तक्ते, उपाध्यक्ष दीपक गुप्ता, सचिव योगेंद्र वाघ, सहसचिव सागर नाईकवाडे, खजिनदार सुभाष गांगुर्डे, सहखजिनदार संजय पवार, कार्यकारिणी सदस्य निरंजन परदेशी, बद्रीनाथ तांदळे, सुरेश खैरमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.