मागील वर्षाच्या तुलनेत घट : व्यापारी म्हणतात, १५ एप्रिलपर्यंत चालणार हंगाम द्राक्ष निर्यात अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:15 IST2018-04-06T00:15:16+5:302018-04-06T00:15:16+5:30
ओझर : द्राक्षांच्या निर्यातीमध्ये भारतातून ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा दोन ते तीन आठवडे आधीच तो संपणार असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत घट : व्यापारी म्हणतात, १५ एप्रिलपर्यंत चालणार हंगाम द्राक्ष निर्यात अंतिम टप्प्यात
ओझर : द्राक्षांच्या निर्यातीमध्ये भारतातून ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा दोन ते तीन आठवडे आधीच तो संपणार असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निसर्गसंकटामुळे निर्यात मंदावली आहे. नाशिक जिल्ह्यातून सर्वात जास्त द्राक्षांची निर्यात युरोप खंडात होत असते. सप्टेंबरच्या मध्यात छाटणी झालेल्या बागांना परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे आवक घटली. साधारण एप्रिलपर्यंत बागा आटोपून झाल्यानंतर निफाड, दिंडोरी, खेडगाव, वडनेरभैरव, साकोरे पट्ट्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यानंतर छाटणीला प्रारंभ होतो. तूर्तास बागायत पट्ट्यांमध्ये रुई, धारणगाव, निफाडचा काही भाग, खेडगाव, अंतरवेली, साकोरे मिग व काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात माल उपलब्ध आहे. नाशकातून द्राक्षांच्या विविध जातींची निर्यात होते. त्यात सर्वात जास्त थॉमसन सीडलेस व शरद सीडलेस यांचा समावेश आहे. त्यानंतर क्रिम्सन, फ्लेम, नानासाहेब पर्पल, तास ई-गणेश व कलर प्रकारांचा विचार केला तर त्याचे उत्पादन कमी प्रमाणात झाले. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये ६८९५ कंटेनरमधून ९०,९९३ मेट्रिक टन द्राक्षांची युरोपात निर्यात झाली होती, तर युरोपव्यतिरिक्त १७५० कंटेनरमधून ४०,९८७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. मागील वर्षी एकूण ८६६५ कंटेनरची निर्यात झाली. यंदाच्या वर्षी मात्र पुढील दहा दिवस वगळता ५६९० कंटेनर्स युरोपात, तर १२०५ कंटेनर्स इतर देशांत निर्यात झाली आहे. पूर्ण देशातून होणाºया निर्यातीत ऐंशी टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असते. दरवर्षी ५ मेपर्यंत चालणारा एक्स्पोर्ट हंगाम यंदा १५ एप्रिलपर्यंतच राहणार असल्याचे अनेक निर्यातदार सांगत आहेत. भावाचा सरासरी विचार केला तर यंदा ८० ते ९० रु पये प्रतिकिलो भाव मिळाला.