नाशिक : काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३१२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ६२५७ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३७३६, तर नाशिक ग्रामीणला २३१० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३१ व जिल्हाबाह्य ८० रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ४१, ग्रामीणला ४६, मालेगाव मनपात १ आणि जिल्हाबाह्य २ असा एकूण ९० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे.
ऑक्सिजनअभावी गेलेल्या मृत्यूची भर जिल्ह्यात बुधवारी बळी पडलेल्या नागरिकांमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने झालेल्या २५ मृत्यूची भर पडली आहे. त्यामुळेच शहरातील बळींची संख्या ४१ वर पोहोचली असली तरी ग्रामीणमध्ये देखील तब्बल ४६ बळी एकाच दिवशी गेले आहेत. त्यामुळेच बुधवारी मृत्यूसंख्या ही थेट ३१२२ वर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे.