कोरोनामुळे आले उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:46 IST2020-07-03T23:58:35+5:302020-07-04T00:46:51+5:30
कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, आल्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

कोरोनामुळे आले उत्पादकांना फटका
नाशिक : कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, आल्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.
द्राक्षाला पर्याय म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकरी आले या पिकाकडे वळाले असून, आल्याची लागवड मर्यादित असल्यामुळे आल्याला जून, जुलै महिन्यात साधारणत: १५ ते १६ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत असतो. यामुळे आले उत्पादकांना हे पीक चांगले आर्थिक उत्पन्न देणारे ठरले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात आले लागवडीचे क्षेत्र वाढत
आहे.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र आले उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील मोठ मोठे हॉटेल्स, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉन्स, मंगल कार्यालय बंद असल्याने आल्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. मागणी घटल्याने आल्याचे दर घसरले असून, सध्या आल्याला सहा ते साडेसहा हजार रुपये क्ंिवटलपर्यंत दर मिळत आहे.
एकरी १५० क्विंटल
जिल्ह्यात सरासरी ४५० ते ५०० एकरवर आल्याची लागवड होते. निफाड, नाशिक, सिन्नर, येवला, दिंडोरी या तालुक्यांमध्ये साधारणत: आल्याची लागवड होत असते. एकरी १२० ते १५० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळते. जिल्ह्यासाठी दररोज १०० ते १५० पोते आले लागत असल्याने जिल्ह्यात पिकणारे आले जिल्ह्यातच विकले जाते.