माफक वीजदरासाठी धोरण निश्चित करणार : मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 27, 2014 01:40 IST2014-12-27T01:40:23+5:302014-12-27T01:40:37+5:30

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन

Chief Minister will fix the policy for moderate power tariff | माफक वीजदरासाठी धोरण निश्चित करणार : मुख्यमंत्री

माफक वीजदरासाठी धोरण निश्चित करणार : मुख्यमंत्री

नाशिक : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत; राज्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच ग्राहकांनाही माफक दरात वीज मिळावी यासाठी धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विजेचे वाढते दर हे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
म्हसरूळरोडवरील देवधर महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, भारतीय मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष के. लक्ष्मा रेड्डी, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, प्रभाकर बाणासुरे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, के. के. हरदास, एस. एन. देशपांडे, अख्तर हुसेन उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, उद्योजक, व्यापारी आणि ग्राहकांना स्वत दरात वीज मिळाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे वीजदर कसे कमी करता येतील यासाठी
केवळ शासनावरच अवलंबून चालणार नाही तर वीज कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्यदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील विजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळेच उद्योजक महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करीत नाहीत, ही परिस्थिती बदलण्यासाठी भूमिका घेतली जाईल. महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक वाढली पाहिजे यासाठी वीज दर कमी करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी सबसिडीमुळे सुमारे आठ हजार कोंटींचा भार उद्योजकांवर पडतो. ही विसंगती दूर होणे अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विजेची गळती ही सर्वांत मोठी अडचण कंपनीसमोर आहे. आज विजेच्या क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण होत आहेत. जोपर्यंत आपण विजेची गळती कमी करीत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा करू शकणार नाही असेही ते म्हणाले.
वीज क्षेत्रात आपल्या तीन कंपन्या असल्या तरी त्या एकच आहेत, केवळ कंपनीकडे बोटे दाखवून चालणार नाही तर कर्मचाऱ्यांनीदेखील आपली कार्यकुशलता आणि क्षमतेतून या कंपन्यांना हातभार लावला पाहिजे. शासन, कंपनी आणि कर्मचारी म्हणून आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. तसे झाले तरच आपण ग्राहकांना माफक दरात वीज उपलब्ध करून देऊ शकू, असेही फडणवीस म्हणाले.
प्रारंभी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर असलेली आव्हाने आणि कंपन्यांचा कारभार याविषयी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister will fix the policy for moderate power tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.