बस दरीत कोसळण्यापासून वाचली
By Admin | Updated: May 6, 2017 00:42 IST2017-05-06T00:42:44+5:302017-05-06T00:42:57+5:30
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी परिवहन महामंडळाची हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

बस दरीत कोसळण्यापासून वाचली
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाची एशियाड हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने जवळपास ४५ प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना आली आहे
नगर आगाराची बस (क्र . एमएच १४ बीटी ४८०२) ही सुमारे ४५ प्रवासी घेऊन जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे जात असताना समोर मालवाहू ट्रकही घाट चढत होता. याच दरम्यान मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हेलकावे खाऊ लागला. हे दृश्य पाहून बसचालकाचेही लक्ष विचलित झाले. बघता बघता ही बस ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे मालवाहू ट्रक घाटातील दरीत कोसळली. मात्र बस नियंत्रणात आणि कठड्यावर आदळून खोल दरीत जाता जाता वाचली आणि रस्त्याच्या मधोमध थाबली. याप्रसंगी ट्रकचालकाने ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचवला.
या बसमध्ये जवळपास ४५ प्रवासी होते. दरम्यान, बसमधील सुरक्षित प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, सध्या जखमींवर नाशिकच्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी समीर चौधरी, सुनील सोनवणे, रवि देहाडे, विजय कुंडगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .