सरकारच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांचा ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:25 IST2018-01-02T15:18:52+5:302018-01-02T15:25:47+5:30
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले,

सरकारच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांचा ‘काळा दिवस’
नाशिक : डोक्यावर ‘मी भुजबळ’अशी घातलेली टोपी, हातात भुजबळ समर्थकाचा पिवळा झेंडा व राज्य सरकार मुर्दाबादच्या काळ्या कपड्यानिशी दिल्या जाणा-या घोषणांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले. निमित्त होते, राज्याचे नेते व सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना जाणून बुजून जामीन नाकारून तुरुंगात अडकवून ठेवल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक समन्वय समितीने पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले, त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी दिवसभर सत्याग्रह केला. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत, केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणा बाजी केली. ‘ वी वॉन्ट जस्टीस’, ‘भुजबळ मांगे जस्टीस’, ‘भुजबळ साहेब झिंदाबाद’, ‘राज्य सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत समर्थकांनी रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे काहीकाळ जुना आग्रारोडवरील वाहतूक खंडित झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी शिष्टमंडळाने समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना सादर केले. त्यात म्हटले आहे की, महाराष्टÑाच्या राजकारणात पन्नास वर्षे वाटचाल करणारे व दलित, ओबीसी, अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यमान सरकारकडून खोटे नाटे आरोपांवर तुरुंगात डांबण्यात आले आहे. यात कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून, भुजबळ यांनी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करूनही निव्वळ तांत्रिक कारणे पुढे करून त्यांच्या सुटकेत अडथळे निर्माण केले जात आहेत, शिवाय काही तथाकथित लोकांना हाताशी धरून न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असून, हा सारा प्रकार म्हणजे भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचेच षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जनभावनेचा विचार करून छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.