भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी
By Admin | Updated: January 12, 2016 23:01 IST2016-01-12T22:56:07+5:302016-01-12T23:01:55+5:30
भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी

भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी
भगवान गायकवाड ल्ल दिंडोरी
जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील यशाने हुरळून गेलेली भाजपा अन् दिंडोरी मतदारंसघातील पेठची एकहाती सत्ता घेतलेली शिवसेना यांनी मतदार आपल्याच हाती सत्ता देतील या आत्मविश्वासावर स्वतंत्र लढत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात कपाळमोक्ष करून घेतला, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पेठच्या निवडणुकीपासून आत्मपरीक्षण करत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतांच्या फॉर्म्युल्यावर जागा लढत
बाजी मारली अन् प्रतिष्ठेची लढाई जिंकलीे.
काही निवडणुकांचा अपवाद वगळता दिंडोरी शहरात नेहमीच माजी आमदार रामदास चारोस्कर यांचे वर्चस्व राहिले असून, या निवडणुकीत त्यांनी आपलेच प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांना सोबतीला घेत शिवसेना-भाजपाला नियोजनबद्धरीत्या दिंडोरीच्या सत्तेतून दूर ठेवण्याची खेळी खेळत आपला करिष्मा दाखवला आहे. दिंडोरी नगरपंचायत जाहीर होताच शिवसेना व भाजपा नेते आपली सत्ता येणार या आविर्भावात स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी करू लागले. त्यांची नेतेमंडळी काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी नव्हे, तर एकमेकांच्या पक्षाला रोखण्यासाठी प्रयत्न करू लागल्याने जणू त्यांच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी स्पर्धक नाही, अशा समजुतीतूनच त्यांची पावले पडत होती, तर याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विजयी होण्याचा निकष लावत गत विधानसभा निवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीवर आघाडीचा निर्णय घेतला. काँग्रेसने दहा, तर राष्ट्रवादीने सहा जागा लढवत एक अपक्षासाठी सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समिती आदि विविध ठिकाणी सत्ता असतानाही छोट्या भावाची भूमिका घेतल्याची टीका सहन करत एकीचे बळ काय ते दाखवून दिले. काँग्रेस आघाडीने शिक्कामोर्तबानंतर व त्यानंतर काहीसा अंदाज आल्याने सेना-भाजपा नेत्यांना युती करण्याची गरज अर्ज भरण्याच्या दोन-तीन दिवस अगोदर वाटू लागली. मात्र त्यास उशीर होत शेवटी युती न होता दोघेही वेगवेगळे लढले. त्यात सेना १६, तर भाजपा १४ जागांवर उमेदवार देऊ शकले. त्यात शिवसेनेच्या अनेक इच्छुकांनी धनुष्य टाकत कमळ हातात घेतले. यावरही कडी झाली ती एबी फॉर्म वाटपाची. त्यातून वादविवाद नाट्य होत सेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत मतदारांमध्ये दुहीचा संदेश गेला. तेथेच शिवसेनेच्या मतदारांचे ध्रुवीकरण सुरू झाले. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शिवसेनेने आमदार धनराज महाले यांना मतदारांचे उंबरठे झिजविण्यास भाग पाडले. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभा घेतल्या. खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचार रॅल्या झाल्या. संपर्कप्रमुख सुहास सामंत, जयंत दिंडे, माजी महापौर विनायक पांडे आदिंनी आपल्या अनुभवाचा कस लावला; परंतु आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी लावलेला चक्रव्यूह तोडण्यात त्यांना सपशेल अपयश आले. भावकीच्या राजकारणात दोन जागा कशाबशा पदरात पडल्याने शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला असला तरी, त्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
भाजपाची लाट ओसरली
देशात, राज्यात व नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील नगरपंचायतीत भाजपाची लाट कायम होती ती दिंडोरीतही राहील या भरवशावर भाजपाने प्रचारावर भर देत तालुकाध्यक्ष चंद्रकांत राजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, मात्र त्यांना त्यात सपशेल अपयश येत चंद्रकांत राजे यांचाच दोन ठिकाणी मोठ्या फरकाने पराभव झाला. अल्पसंख्याक, व्यापारी, इतर मागासवर्ग आदि घटकांना एकत्रित करण्याचा डाव त्यांच्या पुरता अंगलट आला व भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले. अनेक प्रभागांत भाजपाला तीन अंकी संख्या गाठता आली नाही. भाजपाच्या विकास मुद्द्याला मतदारांनी साफ नाकारले. विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शिवसेना-भाजपा विकासाचे काहीही काम करत नाही, मात्र निवडणूक आली की मतांसाठी डोंबाऱ्याचा खेळ करतात. दिंडोरीची पाणीयोजना आम्ही सुरू केली पण शिवसेना आमदारांच्या कार्यकाळातच ती बंद पडली असे सांगत मतदारांना विकासाची हमी देत सत्ता मागितली व दिंडोरीकरांनी त्यांच्या हाती सत्ता दिली आहे. विविध प्रभागात मतदारांना वेगवेगळी विकासाची आश्वासने दिली आहेत. आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची राहणार असून, राज्याचे सरकार युतीचे असताना विकासकामे खेचून आणण्याचे काम आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर यांना करावे लागणार असून, दिंडोरीची पाणीयोजना पूर्ण करत मतदारांची पहिली महत्त्वाची गरज पूर्ण करावी लागणार आहे.