पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा
By Admin | Updated: May 3, 2017 01:18 IST2017-05-03T01:18:11+5:302017-05-03T01:18:54+5:30
राजरत्ननगर : बालकांना केले लक्ष्य; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा
सिडको : पिसाळलेल्या कुत्र्यानेधुमाकूळ घालीत चिमुकल्या बालकांसह १७ जणांना चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात गेल्या सोमवारी (दि. १) सकाळाच्या सुमारास घडली. चावा घेतलेल्या बालकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्यास सुमारे पाच तासांनी पकडण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेच्या नि:श्वास सोडला.
वार सोमवार, वेळ सकाळी अकरा वाजेची. अचानक राजरत्ननगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या बाबतची माहिती नगरसेवक रत्नमाला राणे व भूषण राणे यांना कळताच त्यांनी याबाबतची माहिती महापालिकेस कळविली. परंतु कुत्र्याने काही वेळातच राजरत्ननगर भागासह परिसरातील चिमुकल्या बालकांसह १७ जणांना चावा घेऊन जबर जखमी केले. यात रोहित पाटील (७), हेमंत दोंदे (६), प्राजक्ता कांबळे (५), सोहम वाघ (४), चेतना पाटील (दीड वर्ष) सर्व राहणार राजरत्ननगर, सिडको तसेच एका वृद्धासह १७ जणांना चावा घेतला. या घटनेमुळे नागरिकांनी मनपाच्या आरोग्य विभागाबाबत नाराजी व्यक्त केली असून, अशा मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
‘ते’ श्वान अखेर जेरबंदनाशिक : सिडकोतील उत्तमनगर, मोरवाडी परिसरात पिसाळलेल्या श्वानाने दोन-तीन बालकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. १) घडल्यानंतर महापालिकेच्या पथकाने सदर श्वानास जेरबंद केले असून, श्वान निर्बिजीकरणाची मोहीम नियमित सुरू असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.
सोमवारी उत्तमनगर परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घालत दोन-तीन बालकांना चावे घेऊन जखमी केले होते. नागरिकांनी महापालिकेला कळविल्यानंतर तातडीने डॉग व्हॅन पाठविण्यात येऊन पिसाळलेले श्वान जेरबंद करण्यात आले आहे. सदर श्वान पिसाळलेले आहे किंवा नाही, यावर डॉक्टरांचे पथक नजर ठेवून आहेत. सध्या श्वान निर्बिजीकरणासाठी तीन विभागांकरिता एक डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मार्च २०१७ पासून त्यासाठी नव्याने ठेका काढण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यात २२४ श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.