धरणांनी गाठला तळ
By Admin | Updated: June 1, 2016 00:17 IST2016-05-31T23:41:57+5:302016-06-01T00:17:56+5:30
त्र्यंबकेश्वर : पाणीटंचाईने ग्रामस्थ हवालदिल

धरणांनी गाठला तळ
त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणांनीच तळ गाठल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरे पाळायची कशी या चिंतेने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही योग्य नियोजन नसल्याने मे महिन्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहत नाही. पाणी वापराचे सुयोग्य, काटेकोरपणे नियोजन व वापर केल्यानेच संकटावर मात करणे शक्य होणार आहे. येथील जंगलामध्ये दरवर्षी होणारी घट तसेच पर्जन्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याचे दिसून येते.
तालुक्यात सहा ते आठ छोटी -मोठी धरणे असून, त्या सर्वांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. झालेल्या पावसाने धरणे कशीबशी भरली. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ते पाणीही आटले असून, काही पाझर तलाव उन्हाळ्याच्या मध्यावरच कोरडे ठणठणीत पडले आहेत.
तालुक्यातील कोणे, वाघेरे, तळेगाव, अंबोली, अंजनेरी, नाईकवाडी या धरणांनी तळ गाठला आहे. काही दिवसात तलावही कोरडे पडतील अशी भीती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारी कर्ज भरणेही अवघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात दिवसागणिक पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. यासाठीच येणाऱ्या भावी पिढीसाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा असे म्हणणे योग्य ठरेल. (वार्ताहर)