समाजभान जागल्याचा नि:शब्द हुंकार !
By Admin | Updated: September 25, 2016 00:47 IST2016-09-25T00:47:13+5:302016-09-25T00:47:42+5:30
समाजभान जागल्याचा नि:शब्द हुंकार !

समाजभान जागल्याचा नि:शब्द हुंकार !
किरण अग्रवाल
राजकारण व सहकारात मोठ्या प्रमाणात असूनही उपेक्षाच वाट्याला आलेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाने आपल्या एकीचे विराट दर्शन घडविल्याने सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन गेली आहे.
या मोर्चातून मराठा समाजात जे समाजभान जागले आहे, ते आतापर्यंत अवरुद्ध ठरलेल्या या समाजाच्या उन्नतीच्या वाटा प्रशस्त करण्यास कामी येण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
आपसात भांडून आपलेच नुकसान करून घेण्यात कोण आघाडीवर असतो, तर मराठा; अशीच ज्यांच्याबद्दल नेहमी चर्चा केली जाते त्याच मराठा समाजाने कुठल्याही राजकीय नेतृत्वाखेरीज लाखोंचा शिस्तबद्ध मोर्चा काढून आपल्या मनातील असंतोषाचा जो नि:शब्द हुंकार प्रदर्शिला आहे, त्याकडे केवळ गर्दी म्हणून पाहता येणारे नाही, तर जागलेले समाजभान म्हणून बघता यावे. विशेषत: आजवर ‘पुरुष प्रधान’कीवर श्रद्धा ठेवत घरा-दारातच अडकून राहिलेल्या महिला-भगिनींनी या मोर्चात जो उत्स्फूर्त तसेच लक्षणीय सहभाग नोंदविला तो कौतुकास्पद असण्याबरोबरच दखलपात्रही ठरला असून, या ‘एकी’च्या बळाने सामाजिक संघटन कौशल्याचा आदर्श वस्तुपाठही घालून दिल्याचे म्हणायला हवे.
कोपर्डीतील लाजिरवाण्या घटनेच्या निमित्ताने राज्यभर मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत असून, असाच मोर्चा नाशकातही निघाला. या मोर्चाने नाशकातील मोर्चांचे वा गर्दीचे आजवरचे सारे विक्रम मोडले. मराठा समाजाच्या सामूहिक शक्तीचे हे विराट दर्शन केवळ विस्मयकारी अगर आश्चर्यकारीच नसून सामाजिक, राजकीय, आर्थिक आदि पातळीवर अनेकार्थाने क्रांती घडविणारेच ठरले तर आश्चर्य वाटू नये. सिंहस्थ-कुंभपर्वात गोदास्नान करून पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी जशी गर्दी होते, त्यापेक्षा अधिक प्रमाणात नाशकातील रस्ते भरभरून वाहताना दिसले. नजरेत मावू नये, अशी ही गर्दी होती. बरे, असे असताना कुठेही कसलाही गोंधळ नाही, गडबड नाही. रेटारेटी नाही की फोटोसाठी धडपड नाही. अतिशय शिस्तबद्धपणे व मूकपणे आपल्या मनातील वेदनांची जाणीव करून देत हा मराठा जनसागर नाशकातून प्रवाहित होताना दिसला. हल्ली कुठलाही मोर्चा म्हटला की, प्रशासनाच्या पोटात धस्स होते. त्यातल्या त्यात जातीय वा सामाजिक पातळीवरील असंतोषाची खदखद घेऊन जे मोर्चे काढले जातात, त्याबाबत तर भीतीचे एक दडपणच सरकारी यंत्रणांवर असते. अन्य राज्यांमध्ये काढल्या गेलेल्या अशाच काही मोर्चांना जे हिंसक वळण लागले तेही या भीतीत वाढ करणारे ठरावे. परंतु राज्यात अगदी औरंगाबादेत काढल्या गेलेल्या पहिल्या मोर्चापासून मराठा समाजाने आपल्यातील ‘एकी’बरोबरच संयम व शिस्तप्रियतेचेही जे दर्शन घडवले तेच नाशकातही दिसून आले. मोर्चानंतर रस्त्यावर झालेला कचरा उचलून घेण्याची माणुसकी आजवर कुणी दाखविली? पण, मराठा मोर्चेकऱ्यांनी तेही करून दाखविले. यातील नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, कुठल्याही एका व्यक्ती वा पक्षाच्या नेतृत्वात हे होत नव्हते. समाजाच्या सामूहिक बळावर व सोशल मीडियाच्या प्रचार साथीने सारे नियंत्रित होत होते. त्यामुळे कुठेही श्रेयवादाची स्पर्धा झाली नाही. तरुणवर्ग यात प्राधान्याने पुढे राहिला म्हणूनच या मोर्चाने आदर्श घडविल्याचे म्हणता येणारे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोपर्डीचे निमित्त असले तरी मराठा समाजातील सामान्य वर्गाच्या मनात जी धुम्मस आहे, त्यामुळे ठिकठिकाणी व नाशकातही मोर्चासाठी लाखोंची गर्दी लोटली. मराठा समाजाकडे वतनदार वा सधन म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात तशी सार्वत्रिक स्थिती नाही. मोजक्यांची मातब्बरी वगळता, बहुसंख्य मराठा बांधवांच्या स्थितीकडे जर समाजाचे वा जातीय चष्मे उतरवून पाहिले तर त्यांच्या व्यथा-वेदनेचे कारण व त्यातून उत्पन्न झालेली मनामनातील धुम्मस लक्षात येणे सहज सोपे ठरेल. जमीनदार असलेल्या अनेक आसाम्या, कालौघात वाटे-हिस्से पडल्याने अगर जमिनीची खातेफोड केली गेल्याने आज अल्पभूधारक ठरल्या आहेत. त्यातच शेती व्यवसाय दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. गेल्या काही वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती वा नैसर्गिक अवकृपेमुळे शेती संकटात सापडली असतानाच शेतमालाला उत्पादन खर्च निघून हाती काही उरेल, असा भाव मिळणेही अवघड बनले आहे. जिल्ह्यातीलच कांदा, द्राक्ष व डाळिंबासह भाजीपाला आदि. कोणत्याही पिकाचे उदाहरण घ्या, त्याने शेतकऱ्याला भरभरून दिले, असे अपवादानेच घडते. अशा स्थितीत शासनाने काही मदतीचा हात पुढे करायचा तर तो इतका तुटपुंजा वा थिटा असतो की, त्याने गुंतवणूकही भरून निघू शकत नाही. शेती व्यवसायातील या कमालीच्या ‘अस्थिर’तेमुळे व त्यातून कुटुंब चालविणे मुश्कील ठरत असल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यात ‘मराठा’ समाजाचे प्रमाणही मोठे आहे. सरकारने आत्महत्त्या रोखण्यासाठी भरपूर पॅकेजेस दिलीत, पण त्या कमी होऊ शकलेल्या नाहीत. आपल्या नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, गेल्या अवघ्या नऊ महिन्यात, म्हणजे वर्षही पूर्ण झालेले नाही; ७० शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या घडून आल्या आहेत. निसर्गाने नागवलेल्या व व्यवस्थेकडूनही पिळल्या गेलेल्या या घटकाची दैना असह्य ठरणारी आहे. त्याचाच क्रांतिकारी उद्रेक हा मराठा मोर्चाच्या रूपाने पहावयास मिळाला आहे.
दुसरे म्हणजे, राज्याच्या राजकारणात व सहकारात ‘मराठा’ समाज अग्रणी आहे, हे वास्तव असले तरी अशांचे प्रमाण किती? राजकारण व सहकारातल्या ‘गाद्यां’वर असलेल्यांपेक्षा घरात ‘चादरी’ची मारामार असलेला वर्गही मोठा आहे, याकडे सोईस्करपणे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. बिगर मराठ्यांचे तर होतेच होते, पण स्वकीयांचेही होते ही वास्तविकता नाकारता येणारी नाही. तरी बड्यांच्या ‘माना’ला धक्का लागू नये म्हणून हालाखीतील मोठा वर्ग कायम अडचणींचा व अवहेलनेचा चटका सोसत आला आहे. मराठा समाजातील अनेक मुले मोठ्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करीत नोकऱ्यांच्या बाजारात हाती डिग्रीची प्रमाणपत्रे घेऊन फिरत आहेत; पण तिथे त्यांना संधी मिळत नाही. कशाला, शैक्षणिक प्रवेशाच्या पायरीवरच अनेक विद्यार्थी गुणवंत असूनही आरक्षणामुळे अडखळतात. काहींनी ‘कुणबी’ प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ मिळवला हेदेखील खरे; पण पुन्हा प्रश्न तोच की, अशांचेही प्रमाण किती तर मोजकेच. यासंबंधीची या समाजातील खदखद मोठी आहे; पण तिला व्यक्त होण्याची संधीच आजपर्यंत मिळाली नव्हती. कोपर्डीच्या निमित्ताने ती मिळाली. शेती, शिक्षण व रोजगारात मागे पडत चाललेल्या मराठा तरुणाने पारंपरिकपणे राजकारण वा सहकारात पडायचे तर तिथे तरी काय उरले आहे आता, अशी स्थिती आहे. राजकारणात ज्यांची ‘चलती’ आहे, त्यांचेच चालते. नवख्यांना फारशी संधीच प्रस्थापित मिळू देत नाहीत. सहकार क्षेत्रही जीर्ण झाले असून, साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँका-सोसायट्या आदि बहुतांश संस्था चौकशांच्या जंजाळातच गुरफटल्या आहेत. कायद्याची नित्य नवी बंधने व सभासदांच्याही वाढलेल्या अपेक्षा पाहता या संस्था चालविणेच हल्ली अवघड बनले आहे. त्यामुळे त्यात जाऊन नाव कमावण्यापेक्षा गमावण्याचीच वेळ अधिकेतरांवर ओढवते. ‘पोखरला गेलेला पोकळ वासा’ अशीच सहकाराची गत आहे. म्हणजे शेतीत ‘काम’ नाही आणि राजकारण वा सहकारात ‘राम’ नाही, अशा मोठ्या विचित्र कोंडीत तरुण वर्ग अडकला आहे. तरुणांच्या मनावरील या भळभळत्या जखमेमागील ठसठसच त्यांच्यात सामाजिक व सामूहिक शक्तीचे स्फुल्लिंग चेतवून जाण्यास कारणीभूत ठरली असावी. मराठा मोर्चात तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नियोजनाची सारी सूत्रे स्वीकारल्याचे दिसून आले ते त्यामुळेच.
आणखी एक बाब म्हणजे, वास्तविकतेशी फारकत घेऊन केल्या जाणाऱ्या चित्रणात बदल न करण्याची यच्चयावत साऱ्यांचीच मानसिकता. यामुळे समाजमनावर चढलेली समज-गैरसमजांची पुटे तशीच घट्ट होण्यास मदत होते. पण त्याकडे गांभीर्याने पाहिलेच जात नाही. साधे उदाहरण आहे, चित्रपट वा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कंजुषी करणाऱ्याचे पात्र साकारायचे असेल तर मारवाडीच दाखवला जातो. तसा पाटील म्हटला की तो शोषक व रंगेल असाच प्रदर्शिला जातो. असे होताना आपल्या पाटीलकीच्या प्रभावाने गावाच्या हितासाठी झटणाऱ्या, प्रसंगी कोपरीच्या खिशात हात घालून कुणाला मदत करणाऱ्या वा दुष्काळात आपल्या विहिरीचा पाणवठा सर्वांसाठी खुला करून देणाऱ्या पाटलाची प्रतिमा डागाळली जाण्याचे भान सुटते. आजवर हे खपूनही गेले. नवीन पिढी मात्र या अपवादात्मक स्थितीच्या सरसकटपणे होणाऱ्या भांडवलीकरणाबद्दल रोष बाळगून आहे. म्हणूनच, विशिष्ट समाजवर्गांना चिटकविल्या जाणाऱ्या व त्यातून त्यांची अवमाननाच घडून येणाऱ्या गुण-अवगुणांविषयी सजगता बाळगली जाणे गरजेचे आहे. मराठा मोर्चामध्ये केल्या गेलेल्या यासंबंधीच्या एका मागणीमुळे या मुद्द्याकडेही लक्ष वेधले गेले आहे. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लाखोंची गर्दी होऊनही शिस्तबद्धपणे पार पडलेल्या मराठा मोर्चाच्या अग्रभागी राहण्याचा मान भगिनीवर्गाला दिला गेला, ती मोठी व क्रांतिकारी बाब ठरावी. असे करताना पारंपरिक नेतृत्वकर्ते कटाक्षाने मोर्चाच्या शेवटी राहिले. त्यांचे ना नेतृत्व, ना भाषणबाजी झडली. तरुणवर्गाचाच खरा बोलबाला दिसला. ही खूप काही सांगून जाणारी बाब असून, मोर्चाच्या निमित्ताने समाजभान जागण्यासोबतच नवनेतृत्वाच्या उदयाची आशा जागवणारे शुभवर्तमान म्हणून त्याकडे नक्कीच पाहता यावे.