अंबडला प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:17 IST2020-01-27T23:57:37+5:302020-01-28T00:17:16+5:30
कृष्णानगर बसथांब्याजवळ दाबेली, पाणीपुरी यांसारखे चाट खाद्यपदार्थ हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यास दोघा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दमदाटी करत धमकावून रविवारी (दि.२६) संध्याकाळी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली.

अंबड येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताना महालक्ष्मीनगर भागातील नागरिक.
सिडको : येथील कृष्णानगर बसथांब्याजवळ दाबेली, पाणीपुरी यांसारखे चाट खाद्यपदार्थ हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यास दोघा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दमदाटी करत धमकावून रविवारी (दि.२६) संध्याकाळी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. तसेच तेथून जात असलेले बाजीराव दातीर (४६, रा. दातीर मळा) यांच्यावरही हल्ला चढविल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दातीर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने या दोघा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महालक्ष्मीनगर, कृष्णानगर या भागात गुन्हेगारी फोफावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही येथे काही समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने वाहनांची जाळपोळ केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र जोपर्यंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतल्यामुळे अखेर काही वेळेत नांगरे पाटील घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची समजूत काढत या भागातील वाढलेली गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक ांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेवक राकेश दोंदे, साहेबराव दातीर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
अंबड पोलिसांकडून या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या जात नसल्याने कायदासुव्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नानंतर परिसरातील केवल पार्क, महालक्ष्मीनगर, कृष्णानगर आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या देत संशयित गुंडांना अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.