नवविवाहित युवकाचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: February 9, 2017 00:58 IST2017-02-09T00:57:58+5:302017-02-09T00:58:48+5:30
वीरगावनजीकची घटना : कंधाणे गावावर शोककळा

नवविवाहित युवकाचा अपघाती मृत्यू
सटाणा : पितृछत्र हरपलेल्या एका मुलीशी जेमतेम आठ दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या युवकाचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने कंधाणे गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास सटाणा-ताहाराबाद रोडवरील वीरगावनजीक सदर दुर्घटना घडली. दरम्यान, ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील कंधाणे येथील रूपेश सुकदेव तांबे (२३) हा तरुण बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्वत:च्या दुचाकीवर जायखेडा येथे मोटारसायकल गॅरेजवर कामाला निघाला होता. वीरगावहून ताहाराबादकडे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या मालट्रकचे (एमएच ४१ जी ६७८४) ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीला जबर धडक बसली.
या भीषण अपघातात रूपेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्याचे हवालदार कैलास खैरनार, मन्साराम बागुल यांनी मालट्रक जप्त करून चालकास अटक केली आहे. (वार्ताहर)