ओतूर परिसरात कांदा लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:36 IST2020-12-22T17:35:55+5:302020-12-22T17:36:33+5:30
ओतूर : परिसरात अवकाळी रिमझिम पावसामुळे थांबलेली उन्हाळ कांदा लागवडीला चार दिवसांपासून पुन्हा वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

ओतूर परिसरात कांदा लागवडीला वेग
यावर्षी परतीच्या पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी महागडी कांदा बी घेऊन केलेली लागवड पूर्णपणे वाया गेली होती. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये किलो दराने नगर जिल्ह्यातील गावातून बियाणे आणू शेतकऱ्यांनी उळे टाकले होते. त्याचीही उगवण समाधानकारक झाली नाही. अगोदरच रब्बी हंगाम लांबल्याने व रोपांची टंचाई यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. तसेच मागील वर्षाचा शिल्लक कांदा खराब होत असून भाव कमी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मजूरांची टंचाई सर्वत्र जाणवत असल्याने ठेका पध्दतीने कांदा लागवड केली जात आहे.
ओतूर धरणातील पाणी गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले भाव तसेच सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मर्यादित वेळेत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लागवड पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.