इगतपुरीतून २९३ मजूर गावाकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:01 IST2020-05-03T21:01:02+5:302020-05-03T21:01:54+5:30
इगतपुरी : कोरोनामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी २९३ लोकांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासीशाळेत ठेवण्यात आलेल्या २९३ परप्रांतीयांना खासगी बसने रवाना करताना प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना पागिरे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : कोरोनामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी २९३ लोकांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.
राज्य सरकारने त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली असून, रविवारी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड यांनी त्यांना नाशिकरोडला जाण्यासाठी शाळेच्या सात खासगी बसची व्यवस्था केली. भुसावळ येथून त्यांना घेण्यासाठी स्पेशल रेल्वे नाशिकरोडला येणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल आदी ठिकाणी घेऊन जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली असून, सायंकाळी या विशेष रेल्वेने त्यांना आपल्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती तहसीलदार पागिरे यांनी दिली.
आज सर्व परप्रांतीयांची त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था केल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिनाभरापासुन जेवणासह सर्व व्यवस्था केल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनासह प्रांताधिकारी , तहसीलदार यांचे आभार मानले. यावेळी प्रांत अधिकारी चव्हाण, तहसिलदार अर्चना पागिरे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, डॉ. बाबा देशमुख, डॉ. हेमलता देशमुख, गटशिक्षण अधिकारी प्रतिभा बर्डे, विस्तार अधिकारी अहिरे, योगेश गोवर्धने, नगरपालिका विभागाचे हिरामण कोरडे आदी उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून या निवारा केंद्रात एकूण २९३ हातमजूर होते. त्यात पुरुष २०३, महिला ५० व ४० मुलांचा समावेश होता. यातील ४३ जण महाराष्ट्रातील असून बाकी यूपी व एमपीचे होते. या सर्वांची महिनाभरापासून राहण्याखाण्याची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यांना दोन वेळचा चहा, नास्ता, दोन वेळचे जेवण दिले जात होते. तसेच त्यांची वैद्यकिय तपासणी करुन लसीकरणाचा ज्या मुलांचा शेड्यूल्ड होते अशांचे लसीकरणदेखील केले जात होते.