कोळदा ते प्रकाशा रस्ता रुंदीकरण झाले जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:04 IST2020-08-17T13:04:16+5:302020-08-17T13:04:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. ...

कोळदा ते प्रकाशा रस्ता रुंदीकरण झाले जीवघेणे
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कच्चा रस्ता असल्याने पावसाचे पाणी साचून जागोजागी रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पाण्याच्या मोठमोठ्या डबक्यांमधून वाहन काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शनिवारी सुमारे अर्धा तास एक रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. तापी नदीवरील पुलाला पडलेले खड्डेही अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून आहे. नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी राहिले आहे. त्यातच कोरीट फाटा ते समशेरपूर कारखाना या दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जागोजागी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात याठिकाणी वाहनधारकांचे मोठे हाल होतात. त्यातून छोटे-मोठे अपघाती घडत आहेत. कोरीट फाट्यापासून सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंतचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या तीन दिवसापासून अखंडितपणे पाऊस सुरू असल्याने व रस्ता कच्चा असल्याने रस्त्याला जागोजागी तलावाचे स्वरुप आले आहे. या खड्यात किती पाणी आहे याचा अंदाज येत नसल्याने डबक्याच्या मध्यभागीच वाहन अडकून पडत आहेत. एक वाहन अडकले तर वाहतूक ठप्प होऊन वाहनांची मोठी रांगच लागते. त्यात अडकलेल्या वाहनधारकाची प्रचंड फजिती होते.
गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास अजून किती दिवस सहन करायचा व त्याला जबाबदार कोण? या रस्त्याच्या कामामुळे अजून किती जणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त प्रश्न त्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. शहादा व धडगाव या तालुक्यातून रुग्णांना अॅम्बुलन्सने या मार्गावरून न्यावे लागते आणि नेमके या ढबक्यांमुळे वाहने अडकून पडत आहेत. एखद्या अत्यवस्थ रुग्णास वेळीच उपचार मिळाला नाही तर त्याला प्राण गमवावे लागू शकतात. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त असताना प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या रस्त्याचीही प्रचंड दूरवस्था झाली आहे. या पुलावर मोठा खड्डा पडला असून त्यात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. याठिकाणी तर दररोज अपघात होत आहेत. तापी पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. या खड्ड्यांमुळे पुलालादेखील हादरा बसत आहे. वाहनेही नादुरुस्त होत आहेत व अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या रस्त्याची वेळीच डागडूजी केली नाही तर प्रकाशा येथील ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.