नंदुरबारला आंबेबारा मधून पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST2020-04-02T11:43:05+5:302020-04-02T11:43:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी ...

नंदुरबारला आंबेबारा मधून पाणीपुरवठा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी आष्टे पंपीग स्टेशनची विहिर आटल्याने आता आंबेबारा धरणातून चारीद्वारे पाणी आणून ते शहराला पुरविले जाणार आहे. धरणातील ५० टक्के पाणीसाठा आधीच आरक्षीत करण्यात आला आहे.
नंदुरबार शहराला झराळी व आष्टे पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा केला जातो. झराळी येथील विरचक धरणात यंदा मुबकल पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा यंदा सामना करावा लागणार नाही हे स्पष्ट आहे. आंबेबारा धरणातील ५० टक्के पाणीसाठा देखील आरक्षीत केला जातो. यंदा आंबेबारा धरण देखील ओव्हरल्फो झाले होते. त्यामुळे पाणी पुरवठ्याची फारशी अडचण यंदा येणार नाही हे स्पष्टच आहे.
आष्टे येथे शिवण नदीत नंदुरबार पालिकेने पाणी पुरवठ्यासाठी विहिर खोदली आहे. या विहिरीवरच पंपींग स्टेशन देखील आहे. जोपर्यंत या विहिरीला पाणी असते तोपर्यंत तेथून ३० टक्के भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु ही विहीर साधारणत: मार्च महिन्यात आटून जाते. यंदा देखील ही विहिर आटली आहे. त्यामुळे आता आंबेबारा धरणातील पाणी या विहिरीत टाकले जाणार आहे. धरणातील पाणी सोडण्याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. पालिकेचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.
नदीत चारी खोदून हे पाणी आष्टे विहिरीत येणार आहे. साधारणत: दोन महिने हे पाणी चालू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विहिर अटल्याने झराळी पाणी पुरवठा योजनेवर लोड येत होता. त्यामुळे शहरातील जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. परिणामी अनेक वसाहतींमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. आता आंबेबाराचे पाणी आल्याने पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.
नंदुरबार शहराला विरचक धरणातून ७० ते ७५ टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागातील पाणी पुरवठा हा आष्टे पंपींग स्टेशनमधून केला जातो. त्यासाठी आंबेबारा धरणाचा आधार घेतला जातो. साधारणत: तीन महिने येथून पाणी पुरवठा केला जात असतो.