नळगव्हाणला वाघदेव पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:44 IST2020-08-18T12:44:00+5:302020-08-18T12:44:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या ...

नळगव्हाणला वाघदेव पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : आधुनिक युगातही आदिवासी बांधवांकडून आपल्या पारंपारिक प्रथा परंपरांची जपणूक करण्यात येत आहे. तसेच आपल्या पुढील पिढीतही याची बिजे रोवण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील नळगव्हाण येथे वर्षानुवर्षापासून चालत असलेला निसर्ग देवता तसेच वाघदेवता पूजन कार्यक्रम पार पडला.
दरवर्षी जुलै, आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या या पूजन महोत्सवाला आदिवासी बांधवांच्या रूढी परंपरेमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्या गावाच्या समृद्धी तसेच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी निसर्गदेवतेचे पूजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असते. या वेळी शेतशिवारात लावण्यात आलेल्या विविध पिकांचे पूजन करण्यात येत असते.
आदिवासी बांधवांच्या सण-उत्सवामध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्व असते. किंबहुना आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात राहूनच त्याच्या साक्षीने आपले विविध सण साजरे करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे निसर्गदेवतेचे होणारे पूजन.
आदिवासींच्या दैनंदिन जीवनशैलीचा विचार केला असता, समृद्ध अशा निसर्गाच्या सहवासात राहून आपल्या गरजा या निसर्गच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा कल असतो. त्यामुळे आपल्या विविध उत्सवांमध्ये निसर्गाच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात येत असते.
दरम्यान याचाच दुसरा भाग म्हणजे वाघदेवतेचे पूजन होय. सुरूवातीला आदिवासी बांधव जंगलात वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचा नेहमी जंगलातील हिंसक प्राण्यांशी संबंध येत असे. त्यामुळे अशा हिंस्त्र प्राणांना पळवून लावण्यासाठी आदिवासी बांधवांकडून वाघदेवता पूजनाला सुरूवात करण्यात आली. या प्रथे अंतर्गत एका व्यक्तीला घोंगडे घालून वाघ बनविले जाते आणि दुसºया एका व्यक्तीला देव बनविले जाते. त्यांची पूजा करून नेवेद्य दाखवला जातो. यानंतर त्या वाघाचे रूप धारण केलेल्या व्यक्तीला दुसºया गावाच्या शिवारापर्यंत पळवून सोडले जाते. या वेळी त्याला इजा होणार नाही या पद्धतीने मातीचे गोळे बनवून मारण्यात येतात.
यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आपला बचाव होऊन ते आदिवासी बांधवांच्या वसाहतीपासून लांबच राहतात, अशी धारणा यामागची आहे. तसेच पूजनासाठी भात आणि रानभाजीच्या नेवैद्याचेही नियोजन यात करण्यात येत असते. यानंतर हे नेवैद्य घरोघरी प्रसाद म्हणून सागाच्या पानात पुड्या बांधून वाटण्यात येत असतो.
आपली हजारो वर्षाची प्रथा, परंपरा जोपासण्यासाठी याचे बिजे पुढच्या पिढीत रूजविण्यात येत असतात. कालांतराने यात मोठ्या प्रमाणात बदल होत असले तरी आजपावेतो ही परंपरा टिकवून ठेवण्यामागे आदिवासी बांधवांचा मोलाचा वाटा आहे.