Vidhan Sabha 2019: मजूर स्थलांतरामुळे उमेदवारांना धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:36 IST2019-10-14T12:36:11+5:302019-10-14T12:36:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेत्यांच्या पक्ष बदलांमुळे आणि ऐनवेळी उमेदवारी बदलांमुळे यंदाची निवडणूक सर्वच जागांवर प्रतिष्ठेची ठरली आहे. ...

Vidhan Sabha 2019: मजूर स्थलांतरामुळे उमेदवारांना धडकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नेत्यांच्या पक्ष बदलांमुळे आणि ऐनवेळी उमेदवारी बदलांमुळे यंदाची निवडणूक सर्वच जागांवर प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे उमेदवारांना एक, एका मतांची गरज लागणार आहे. एकीकडे राजकीय पक्षांकडून मतांची गोळाबेरीज सुरू असतांना दुसरीकडे मात्र, दरवर्षाप्रमाणे जिल्ह्यातून मजुरांचे लोंढेच्या लोंढे परराज्यात निघत आहेत. यामुळे उमेदवारांना धडकी भरली आहे. मजुरांना स्थलांतरापासून रोखणेही जिकरीचे असल्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांची हतबलता दिसून येत आहे.
जिल्ह्यात निवडणुकांची राजकीय धुमाळी मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. गावोगावी जावून मतदारांच्या भेटी घेत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते फिरत आहेत. येत्या दोन, तीन दिवसात आणखी रंगत वाढणार आहे. असे असतांना मजुरांच्या स्थलांतराची रिघ पुन्हा सुरू झाली आहे. यंदा पाऊस लांबल्याने मजुरांचे स्थलांतरही लांबेल अशी शक्यता होती. परंतु गुजरातमधील अनेक साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणार आहेत. शिवाय त्याच भागात सध्या पीक कापणी, मळणी यासह इतर शेतीउपयोगी कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी मजुरांची चणचण लक्षात घेता मजुर ठकेदारांनी आतापासूनच मजुर नेण्यास सुरुवात केली आहे.
यंदा दरवर्षाप्रमाणे मोठय़ा संख्येने मतदार मजूर जात असल्याने उमेदवारांना धडकी भरली आहे. यंदा कधी नव्हे ते प्रथमच चारही मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारांना एकाएका मतांची पडली आहे. त्यामुळे प्रचाराबरोबरच स्थलांतरीत मजुरांवरही उमेदवारांना लक्ष ठेवावे लागत आहे. त्यासाठी कार्यकत्र्याना कामाला लावण्यात आले आहे. मजुरांना रोखणे शक्य नसले तरी त्यांना मतदानाच्या दिवशी तरी आणता येईल किंवा कसे याची चाचपणी उमेदवारांच्या कार्यकत्र्याना करावी लागत आहे.
स्थलांतरीत झालेल्या मजुरांचा पत्ता, त्यांच्या ठेकेदाराचे नाव, कंपनी किंवा शेतमालकाचे नाव व दूरध्वनी क्रमांक, सोबत जाणा:या मजुरांची संख्या आदी माहिती सर्वच प्रमुख उमेदवार घेत आहेत. 21 रोजी मतदान आहे. त्याच्या दोन दिवस आधी अर्थात 19 किंवा 20 रोजीच अशा मजुरांना घेण्यासाठी वाहनांचे ताफे रवाना होणार आहे. गेल्या निवडणुकीत देखील अशा मजुरांना घेण्यासाठी अलिशान गाडय़ा पाठविण्यात आल्या होत्या. याशिवाय ठेकेदारांशी देखील संपर्क ठेवण्याच्या सुचना कार्यकत्र्याना करण्यात येत आहेत.
स्थलांतरीत मजुरांची समस्या दरवर्षाची आहे. संख्या देखील वाढतच आहे. यंदा देखील 60 हजारांपेक्षा अधीक मजुरांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. दरवर्षाची ही सरासरी आहे. यंदा पाऊस-पाणी चांगले असल्याने व त्यामुळे स्थानिक ठिकाणी रोजगार मिळेल अशी अपेक्षा असतांनाही स्थलांतर कायम आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवानंतर अर्थात दस:यानंतर मजुरांचे स्थलांतर सुरू होते. त्यासाठी महिनाभर आधी संबधित ठेकेदार गावोगावी जाऊन मजुरांच्या संपर्कात असतात. गुजरामधील सौराष्ट्र, गणदेवी, सुरत चाररस्ता, अहदाबाद आदी भागात संबधीत ठेकेदार मजुरांना नेत असतात. नेण्याचा व आणण्याचा खर्च ठेकेदाराचा असतो. मजुरीच्या ठिकाणी दोन वेळचे जेवण, स्थानिक स्तरापेक्षा जास्त मजुरी, कपडे आदी मिळत असते. काही ठिकाणी जेवनाची सुविधा नसते. सर्वाधिक धडगाव व अक्कलकुवा, शिरपूर, साक्री भागातील काही भागासह तळोदा, नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील मजुरांचे प्रमाण असते.