कोरोनाची लक्षणे नाहीत...पण तापाने रुग्ण फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:43+5:302021-04-02T04:31:43+5:30
कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्याप्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप ...

कोरोनाची लक्षणे नाहीत...पण तापाने रुग्ण फणफणले
कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्याप्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला, तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता जवळ असलेल्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज शेकडो तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात अर्ध्याहून जास्त नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले, तरी अर्ध्याहून अधिक ग्रामीण भागातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान १०० रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल आजार समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी, रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
धूर फवारणीची गरज
शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. परंतु खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल असून, गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींमार्फत उपाययोजना करून धूर फवारणी करण्यात यावी. जेणेकरून काही प्रमाणात साथीच्या आजाराला आळा बसेल, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.
वातावरणातील बदलांमुळे ग्रामीण भागात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया, सर्दी, डोकेदुखी व अशक्तपणा असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर साथीचे आजारही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी.
-डॉ. हर्षल पाटील, सुलतानपूर, ता. शहादा