ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा दिलेल्या ९ जणांची चाैकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:44+5:302021-02-11T04:33:44+5:30
जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ...

ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा दिलेल्या ९ जणांची चाैकशी सुरू
जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन विस्तार अधिकारी नियुक्त केले होते. दरम्यान, पदाधिकारी व शासकीय सेवकांनी आणलेल्या हिशोबाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात दिवसभर आकड्यांचा खेळ सुरू राहिल्याने निष्कर्ष निघू शकला नाही. परिणामी माजी सरपंच अमरसिंग हुपा वळवी, प्रशासक आर. एम. देव, प्रशासक जे. एस. बोराळे, माजी सरपंच उषाबाई बोरा, माजी उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, विद्यमान सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, आनंदा पाडवी व ग्रामसेवक एस. आर. कोळी यांना गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून पुन्हा जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून बुधवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व ९ जणांनी केवळ त्यांचे लेखी जबाब आणल्याची माहिती आहे. अक्कलकुवा ग्रामंपचातयींच्या दप्तरात मोठ्या प्रमाणात तफावती असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गुरुवारी दिवसभर सर्वांची समोरासमोर चाैकशी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम निष्कर्ष समोर येण्यास मात्र उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा निकाल तातडीने लागणे शक्यच नसल्याचा दावा प्रशासकीय वर्तुळातून केला जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे फावले
बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथे आले होते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व वरिष्ठ अधिकारी हे नाशिक येथे गेले होते. यातून तीन विस्तार अधिकाऱ्यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा बजावलेल्या ९ जणांची चाैकशी केली. चाैकशीवेळी संबंधितांनी त्यांच्या कार्यकाळात निधी खर्च केल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
२०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. यानुसार ही चाैकशी सुरू आहे.