पेट्रोलियम पाईपलाईनचा वाद पेटण्याची चिन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:49 PM2020-10-29T12:49:03+5:302020-10-29T12:49:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडीयन ऑईल कॉरर्पोरेशन लिमिटेडची पेट्रोलियम पाइपलाइन नवापूर तालुक्यातील १७ गावांमधून जाणार आहे. ५० किलोमीट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : इंडीयन ऑईल कॉरर्पोरेशन लिमिटेडची पेट्रोलियम पाइपलाइन नवापूर तालुक्यातील १७ गावांमधून जाणार आहे. ५० किलोमीट लांबीच्या या पाईपलाईनसाठी ३३० शेतकऱ्यांच्या जमिनी वापरण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्याला शेतकर्यांनी विरोध केला असून यामुळे शेतकरी व आयओसी या कंपनीचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
नवापूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी व इंडियन ऑईलच्या अधिकार्यांचा संघर्ष पेटलेला आहे. स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ,आदिवासी संघटना यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालयात व पोलिस ठाण्यात निवेदने दिली, बैठकीत घेण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या कुठल्याही निवेदनाची, बैठकीची दखल घेत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा स्थानिक शेतकरी व संघटनांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी इंडियन ऑइल कंपनीकडून पुर्ण मोबदला दिला गेला नसल्याचा आरोप केला आहे. तर कंपनीने ज्या शेतकर्यांच्या जमिनीवर काम केले आहे. त्यांना धनादेशाने मोबदला दिल्याचा खुलासा केला आहे.
कंपनीकडून जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देण्यात येत आहे. जमिनीतून पाइपलाइन गेल्यास शेतकऱ्यांना इतर बांधकाम व बिनशेती करता येणार नाही. पाइपलाइन गेलेल्या क्षेत्रामध्ये विहीर, बोअरवेल, शेततळे, यासाठी खोदकाम करता येणार नाही. जमीन विक्री करण्याचे ठरवल्यास त्याचा चांगला मोबदला मिळणार नाही. पेट्रोलियम पाइपलाइन प्रकल्प मनमानी पद्धतीने पूर्ण करण्याच्या तयारीत प्राधिकरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून या पाइपलाइनसाठी जमीन अधिग्रहण थांबवण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन बुधवारी नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी व नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना देण्यात आले.
नजीकच्या काळात दुर्घटना घडण्याची शक्यता
पेट्रोलियम पाइपलाईनचा पहिला सर्व्हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत आहे. दुसरा सर्व्हे पिंपळनेर ते सोनगड असा वनक्षेत्रातून आहे. त्यात नवापुर तालुका येत नाही.म्हणून दुसरा सर्वे पिंपळनेर ते सोनगड दरम्यान वनक्षेत्रातून पाईपलाईन काढल्यावर शेतकऱ्यांचे कमी नुकसान होईल.असा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. नवापूर तालुक्यातून एकूण १६ गावामधून पाईप लाईन जाते आहे. यात ३१ वेळा रस्ता ओलांडला गेला आहे तर १८ वेळा नदी व नाले ओलांडून पाईपलाईन जाते. त्यामुळे येत्या काळात वाहतूकीस अडचण व अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिकार्यांचा दावा
दरम्यान आयओसीचे वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या प्रणव चाैरसिया यांनी, शेतकऱ्यांचे कोणतीही जमीन अधिग्रहीत केलेली नाही. पेट्रोलियम पाईपलाईन साठी वापर करून त्यांना जमीन शेती करण्यासाठी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला शेतकर्यांनी उपस्थिती द्यायला हवी होती. बडोदा ते सोलापूर ७५० किलोमीटर गेली आहे. यात २९ तालुके येतात. यात आदिवासी बहुल नवापूर तालुक्याला सर्वाधिक चांगला मोबदला देण्यात आल्याचा दावा केला आहे.