हिरालाल रोकडेलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन तालुक्यातील असलोद गावासाठी फलदायी ठरले आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी-व्यवसायातून इतर जिल्ह्यांत वास्तव्यास असलेले बऱ्याच वर्षांनंतर गावात थांबले. यादरम्यान त्यांनी गावाच्या समस्या जाणून घेत त्या सोडविल्या हाेत्या. या विश्वासातून थेट ग्रामपंचायत निवडणूक विजयाची गवसणी घालण्याची किमया त्यांनी करुन दाखवल्याने तालुक्यात या अनोख्या विजयाची चर्चा सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत नोकरी-व्यवसायानिमित्त इतरत्र असणारे गावकरी प्रथमच दीर्घकाळ थांबून होते. बहुतांश खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह करणारे समविचारी असल्याने लाॅकडाऊन काळात गावातील समस्या दिसून आल्याने त्या सोडवण्याचा चंगच त्यांनी बांधला. यातून एका सेवाभावी संंस्थेची स्थापन केली. यातून त्यांनी सर्वप्रथम गावातील विहिरीवर विजेचा ट्रान्सफार्मर बसवून पाण्याची सोय केली. यामुळे गावकऱ्यांना मुबलक पाणी वेळेवर उपलब्ध होऊ लागले. त्याचप्रमाणे गावात व इतर ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचा प्रयत्न केला. दारूबंदीसाठी प्रयत्न करून अवैधरीत्या विक्री होत असलेल्या दारूची दुकाने बंद केली. यासह गावातील विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता त्यांनी केली. संस्थेच्या माध्यमातून गावात होत असलेल्या कामांचे फलित पाहून ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुलाब भील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नऊ जागा लढविल्या. पैकी आठ जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यातील सात नवनिर्वाचित सदस्य अवघ्या ३५ ते ४० वयोगटातील आहेत. सर्वांनी गावातील सत्ताधाऱ्यांंचा पराभव केल्याने गावात सोमवारी आंनदोत्सव साजरा होत होता.
पाच वर्षांचा संकल्प मांडला पॅनेल प्रमुख राजू वानखेडे व उप पॅनेल प्रमुख संजय जगताप, दरबार गिरासे, जगन शिरसाठ, योगेश मराठे, तसेच युवक व ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत असलोद बीएसपी गाव विकास पॅनेलच्या नऊ पैकी सात उमेदवारांचा विजय झाला. येत्या पाच वर्षांचा संकल्प त्यांनी मांडला होता.
गावात परतले सरला अजय गिरासे, प्रकाश गुलाब भील, सुशीलाबाई प्रकाश भील, विलास प्रकाश पवार, संतोष देवीदास चव्हाण, अजय सोनवणे बिनविरोध, सुलोचना दिलीप पवार, अजय दाजू सोनवणे, तुकीबाई प्रकाश भील, रेखा लीलाचंद पवार, दीपक भीमसिंग गिरासे हे विजयी झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार पराभूत केले.
असलोद पॅटर्नची चर्चा : सामाजिक कार्य करत गावाचे लक्ष वेधून घेणा-या नोकरदारांच्या या प्रयत्नांना तालुक्यात असलोद पॅटर्न म्हणून बघितले जात आहे. तशी चर्चा सध्या तालुक्यात आहे.