चार दिवसात होईल दीड लाख कोंबड्यांचे किलींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:41 IST2021-02-08T12:41:19+5:302021-02-08T12:41:27+5:30

महेश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : येथील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आज जिल्हा प्रशासनाने ...

One and a half lakh hens will be killed in four days | चार दिवसात होईल दीड लाख कोंबड्यांचे किलींग

चार दिवसात होईल दीड लाख कोंबड्यांचे किलींग

महेश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : येथील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आज जिल्हा प्रशासनाने या पोल्ट्रीतील चार लाख कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास आज पासून सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपासून पिंपळनेर चौफुलीवरील डायमंड पोल्ट्रीत प्रशासनाने जलद गतीने कोंबड्यांच्या किलिंग चे काम सुरू केले आहे. या ठिकाणी येत्या चार दिवसांमध्ये दीड लाख कोंबड्यांचे किलिंग केला जाणार आहे, तर अन्य पोल्ट्री फार्म वर निगराणी ठेवली जाणार आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मच्या कोंबडीचे नमुने हे बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. 
या ठिकाणी नाशिक, नगर ,जळगाव,धुळे अशा उत्तर महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. १०० पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी किलिंग चर काम केले जात आहे. चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे.
नवापुर तालुक्यातल्या चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तब्बल पंधरा वर्षांनी नवापुर बर्ड फ्ल्यू शिरकाव झाला आहे.  मागच्या आठवड्या्यात नवापुर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुकुटपक्षांच्या मृत्यु झाल्याने जवळपास चार पोल्ट्री फार्म मधील अहवाल तपासणीसाठी पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत  पाठवड्यात आले होते.अहवाल प्राप्त झाल्याने याठिकाणी बर्ड फ्यूलचा शिरकाव झाल्याने चार पोल्ट्री फार्म मधील जवळपास चार लाख कोबड्यांची कत्तल करून प्रशासनाच्या वतीने सुरुवात झाली आहे. तर या फार्मच्या परिसरातील १२ अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्या देखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला आहे. एकट्या नवापुर तालुक्यात २८ पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास साडे नऊ लाख कुकुटपक्षी आहेत. या निर्णयाने कुकुटपालन व्यावसायिकांचे मात्र करोडो रूपयाचे नुकसान होणार असुन २००६ च्या बर्ड फ्ल्यू नंतर जेमतेम उभारी घेत असलेला हा व्यवसाय पुन्हा डबघाईला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन नवापुर तालुक्यातील अंडी, कोंबडी,मास विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. तर नवापुर तालुक्यात कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसात पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले असून उर्वरित २२ पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे अहवाल देखील पाठवून रिपोर्ट पॉझिटिव आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. 
ग्रामीण भागात  दवंडी 
नवापूर तालुक्यातील कुक्कुट पक्षी सोबत देशी कोंबडया बदके व इतर पक्षी यांना बर्ड फ्लू रोगाची लागण होण्याची संभावना लक्षात घेता सर्व ग्रामस्थांना व शेतक-यांना दवंडी देऊन आपल्या घरी,शेतात,पाळलेल्या सर्व कोंबडया,बदके व इतर पक्षी यानांही सदर रोगाची लागण झाल्याची तीव्र संभावना लक्षात घेता व त्यापासून ग्रामस्थांना बर्ड फ्लू रोगाची लागण होवू नये. 
यासाठी आपल्या कडील सर्व पाळीव व जिवंत कोंबडया, कबुतर,बदके,इतर पक्षी शासनाच्या वाहनात ट्रॅक्टर मध्ये तात्काळ जमा करावेत. त्यासाठी शासनामार्फत आज,उदया ट्रॅक्टर,पीकअप वाहन आपल्या गावात पाठविण्यात येणार आहे. पक्षी जमा करताना सोबत ग्रामस्थांनी,शेतकऱ्यांनी त्यांचे बँक पासबुक,आधारकार्ड, सोबत आण्यासाठी सांगितले आहे. 
पाळीव पक्षी शासकीय वाहनावरील कर्मचा-यांकडे दयावी. कोणीही यामध्ये टाळाटळ करु नये. केल्यास संबधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ नुसार, तसेच प्राणी संक्रमण व नियंत्रण, प्रतिबंध करणे २००९ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

दक्षीण गुजरातसह खान्देशात केला जातोय  येथील चिकन व अंडीचा पुरवठा
 सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिंपळनेर चौफुलीजवळील डायमंड पोल्ट्री ४० हजार पक्षी मारण्यासाठी  पशुसंवर्धन विभागातील २०० कर्मचाऱ्यांनी  कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. 
नवापुर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतील ग्रामसेवकांनी पोल्ट्रीचा पंचनामा करण्यासाठी पाठवण्यात आले होते. 
तालुक्यातील २००६ साली झालेल्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक होती त्या तुलनेने २०२१ मध्ये बर्ड फ्लू आजाराची तीव्रता कमी दिसून आली.
तालुक्यातील २८ पोल्ट्री मधील कोंबड्या अंडी सर्वाधिक गुजरात राज्यातील सुरत, नवसारी, व्यारा, बारडोली, वापी दमण या भागात जात होते तसेच महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या परिसरामध्ये पक्षी अंडी विक्री केली जाते. 
नवापुर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय महाराष्ट्रातील खानदेश व गुजरात राज्यातील दक्षिण गुजरात साठी बिजनेस हब ठरला आहे. 

जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक...
 नवापुर पिंपळनेर चौफुली नजीक असलेल्या डायमंड पोल्ट्रीमध्ये साधारण २०० पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत २१ हजार कुकुट पक्षांना नष्ट केले आहे. त्याआधी सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून सर्वांना टॉमी फ्लूचे औषध देऊन पोल्ट्री मधील शेडमध्ये पक्षी नष्ट करण्यासाठी पथके रवाना केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुट पक्षी ना जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्यात चुना निर्जंतुकीकरण औषध टाकून पुरविण्यात आले आहे.सर्वात आधी डायमंड पोल्ट्री मधील कोंबड्यांना पाण्यात बेशुद्धीचे औषध टाकले त्यानंतर कुकुट पक्षांना  किलिंग करण्याची प्रक्रिया राबवण्यात आले. 
 जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक    घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पक्षी शास्रीय पद्धतीने कत्तल करणाऱ्या पथकांना औषधे, पीपीई कीट, मास्क तसेच आवश्यक साहित्य तत्काळ देण्यात यावे. त्यासाठी आरोग्य पथकाची   नेमणूक करावी. नियंत्रण कक्षाची तातडीने सुरुवात करण्यात यावी. बाहेरून कुक्कुट पक्षी शहरात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने परिसरात बर्ड फ्लूबाबत जनजागृती करावी. पोल्ट्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित   होते.

दहा कि.मी.परिसर राहिल निगराणी क्षेत्र...
 नवापुर शहराच्या १० कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुटपक्षी, अंडी व पक्षी खाद्याची खरेदी/विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा/प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील ९० दिवसांपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.
१० कि.मी. त्रिज्येतील परिसरात गावातील आवागमन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात येत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये जा करण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रसारीत परिसराच्या बाहेर लावावी.
बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात जिवंत व मृत वन्यपक्षी / कुक्कुटपक्षी, अंडी,कोंबडी खत, पशुखाद्य अनुषंगीक साहित्ये व उपकरणे इ.च्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
व्यावसायिक पोल्ट्री फॉर्म मध्ये मालक/कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन (ग्लोज,मास्क इ.) कामकाज करावे.फार्म सोडतांना स्वतःचे निर्जतूकीकरण करून घ्यावे.
बर्ड फ्लू बाधित क्षेत्राच्या नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस नियंत्रित करावे, बर्ड फ्लू बाधित क्षेत्राच्या परिसरात २% सोडियम हायपोक्लोराईट, पोटॅशियम परमैंगनेट व्दारे निर्जंतुकीकरण करावे.
बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात व परिसरातील वन्यपक्षी/कुकुटपक्षीसंबंधितांच्या सर्व नोंदी व्यवस्थित विशेष दक्षता घ्याव्यात, उघड्यावर मृत पक्षी /कोंबडी टाकु नये व तसेच त्यांची शास्त्रीय दृष्टीने विल्हेवाट स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिली आहेत. 
 

Web Title: One and a half lakh hens will be killed in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.