नोकरीवालाच वर हवाची मानसिता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:32+5:302021-03-19T04:29:32+5:30
नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि ...

नोकरीवालाच वर हवाची मानसिता वाढली
नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि नोकरीवाला वर पाहण्याकडे कल राहत आहे. त्यामुळे बेरोजगार किंवा शेतकरी वराला अपेक्षित मागणी राहत नसल्याचे चित्र आहे. वधू-वर सूचक मंडळातदेखील वधूकडील मंडळींच्या अपेक्षा याबाबत बरेच काही सांगून जात आहे.
सध्या कोरोनाचा कहर असला तरी लग्नांचे बार उडविण्याचे कमी झालेले नाही. शासन, प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून किंवा काही भागात त्याचे पालन न होताच मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभ होत आहेत. समाजात सध्या मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. जन्मदरातील तफावतदेखील बरेच काही सांगून जात आहे. जिल्ह्यात दर हजारामागे मुलींचा जन्मदर हा ९८० पर्यंत आहे. गेल्या काही काळात तो स्थिर असला तरी यामुळे मात्र लग्नासाठी अनेकांना वधू मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वधूपिता व तरुणी शिक्षित आणि नोकरीवाला वर शोधत आहेत.
सद्या कोरोनामुळे लग्न समारंभांवर मर्यादा आल्या आहेत. कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ आटोपते घ्यावे लागत आहेत. त्यात पैसा आणि वेळही वाचत असल्याने समाधान आहे.
अटी मान्य असतील तरच लग्नाचे बोला...
वधूपित्याकडून वरमंडळींना विविध अटी घालण्याचे प्रमाणदेखील सध्याच्या स्थितीत वाढत आहे. यामुळे मात्र एकत्र कुटुंब, थोरामोठ्यांचा मानसन्मान यांना तिलांजली दिली जात असल्याचेही चित्र निर्माण होत आहे. लग्नाच्या आधीच वधूकडील मंडळींकडून टाकल्या जाणाऱ्या अटींमध्ये मुलगा शहरी भागातच राहणारा असावा. नोकरीच्या ठिकाणीच त्याचा फ्लॅट किंवा भाड्याचे घर असावे. सोबत सासू, सासरे किंवा इतर कुणीही मंडळी नको. मुलगा सहसा नोकरी करणाराच असावा व ग्रामीण भागात राहणारा नसावा अशा अटी असतात. ज्याच्याकडे शेती मोठ्या प्रमाणावर असली तरी केवळ शहरी भागात राहत नाही म्हणून त्याला नकार देण्याचे प्रकारदेखील वधूकडील मंडळींकडून घडल्याचे चित्र आहे. त्यामुळे वधूमंडळींच्या वाढत्या अपेक्षा आणि अटींमुळे वराकडील मंडळींना ते जिकिरीचे ठरत असल्याचेही दिसून येते.
वधूकडील मंडळींच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. यामुळे सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आता प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तडजोडीने व समविचारी घराणे मिळाले अशा ठिकाणी सोयरीक जुळविण्यास हरकत नाही.
- एक वरपिता, नंदुरबार
मुलींची संख्या कमी होत असली तरी वराकडील मंडळींकडून अपेक्षा कमी झालेल्या नाहीत. विवाहात अमुकच पाहिजे, लग्न समारंभ भव्य-दिव्य झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. कोरोनामुळे मर्यादा आल्या असल्याने समाधान आहे.
-वधूपिता, नंदुरबार