लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांपैकी एक असलेल्या मोड येथे कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून स्वयंस्फूर्तीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ ग्रामस्थ किमान अधिकाधिक वेळ घरीच रहावेत यासाठी गावाचे सरपंच आणि पदाधिकारी दिवसातून दोनवेळा गावात ‘सर्वांनी घरातच राहूनच कोरोनासोबत लढावे, बाहेर पडू नये गाव बंद आहे़’ अशी जागृती करुन ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत़तळोदा ते बोरद आणि पुढे शहादा ह्या ग्रामीण भार्गावरील मुख्य गाव म्हणजे मोड होय़ देशात कोरोनाची दहशत सुरु झाल्यानंतर आधी संचारबंदी आणि नंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रशासन कोटेकोरपणे नियमांचे पालन करत असताना मोड गावाने प्रथम सभा घेऊन जनजागृतीवर भर दिला होता़ कोरोनाची इत्थंभूत माहिती दिल्यानंतर गाव बंद करण्याचा निर्णयही गावाने घेतला होता़ ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग माळी यांनी वेळोवेळी गावात माहिती दिल्यानंतर आजघडीस गावात पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ आहे़ गावात बाहेरगावाहून येणारे तसेच बाहेरगावी जाणारे यांची आरोग्य तपासणी करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे़ गेल्या काही दिवसात गावात स्वच्छतेचे उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने ट्रॅक्टरद्वारे फवारणी, गावातील सर्वच जणांना मास्क वाटप, गरजूंना महिनाभर पुरेल एवढे धान्य याचे वितरण करण्यास प्रारंभ केला आहे़ यातून गावात कोरोनासोबत लढण्याचे बळ ग्रामस्थांना आले असून गावातील ज्येष्ठ, सधन शेतकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी हे सातत्याने एकमेकांसोबत सोशल मिडिया आणि प्रत्यक्ष अंतर ठेवून घेतलेल्या भेटीतून उपाययोजना सुचवत आहेत़ अद्याप किमान १४ दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांचा असून कोरोनासोबत लढा देण्यासाठी सोमवारपासून सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत गावात सगळ्यांना फिरण्यास मनाई करण्याचे आदेशच काढण्यात आले आहेत़ ़शेतशिवारातील शेतीकामांना ब्रेक लागल्याने मजूरांची आबाळ होत आहे़ त्यावर मार्ग काढत ग्रामपंचायत प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदाराला सूचना करुन धान्याची आवक करुन घेतली होती़ यानुसार प्रत्येक लाभार्थीला धान्य पुरवठा होत आहे़४एकूण ५ हजार १५३ नागरिकांची संख्या असलेल्या मोड गावात १९ किराणा दुकाने आहेत़ ही सर्व अत्यावश्यक सेवा म्हणून काही कालावधीसाठी सुरु करण्यात येतात़ गावात दोन औषधी विक्रेते आहेत़ त्यांची सेवा २४ तास सुरु आहे़ दोन खाजगी डॉक्टर अवितरत सेवा देत आहेत़ एक रॉकेल व एक स्वस्त धान्य दुकान नागरिकांना दिलेल्या वेळेत सुरु ठेवण्यात येते़ सोबत तीन भाजीपाला दुकाने सुरु ठेवून भाजीपाला पुरवठा होत आहे़४गावातील तीन पानटपऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गेल्या आठ दिवसांपासून सील करण्यात आल्या आहेत़ गावात दक्षता म्हणून ग्रामपंचायत दररोज औषध फवारणी करुन निर्जुंतूकीकरण करत आहे़ बाहेरगावाहून आलेले आणि येणारे यांची माहिती प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आली आहे़ लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे़गावात कोरोनाची दहशत वाढू नये यासाठी सरपंच जयसिंग माळी हे सकाळी काही वेळ गावातून फिरुन लाऊडस्पिकरद्वारे मार्गदर्शन करत आहेत़ त्यांच्यासोबत सदस्य, ग्रामसेवक हेही उपस्थित असतात़
मोड येथे ग्रामस्थांनी केला ‘कोरोना’शी लढण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:59 AM