अपूर्ण अवस्थेतील रस्ता कामामुळे गमवावा लागला अनेकांना जीव- तोरणमाळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST2021-01-24T04:15:05+5:302021-01-24T04:15:05+5:30

तोरणमाळ ता.धडगांव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत १४ पाड्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७३ वर्षानंतरही या भागात शासनाने कुठल्याच मूलभूत सुविधा ...

Many people lost their lives due to incomplete road work | अपूर्ण अवस्थेतील रस्ता कामामुळे गमवावा लागला अनेकांना जीव- तोरणमाळ अपघात

अपूर्ण अवस्थेतील रस्ता कामामुळे गमवावा लागला अनेकांना जीव- तोरणमाळ अपघात

तोरणमाळ ता.धडगांव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत १४ पाड्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७३ वर्षानंतरही या भागात शासनाने कुठल्याच मूलभूत सुविधा या पाड्यांतर्गत राहणाऱ्या सुमारे २० हजारपेक्षा अधिक ग्रामस्थांना पुरवलेल्या नाहीत. आजही येथील ग्रामस्थ निसर्गाच्या सानिध्यातच वास्तव्यास आहेत. सातपुडा पर्वत रांगेत अती दुर्गम भागात हे १४ पाडे असून येथून जवळच गुजरात व मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक बाबी, आरोग्य सुविधा, मूलभूत गरजेसाठी तोरणमाळ येथे पायपीट करीत यावे लागते. सुमारे २७ कि.मी. अंतरावरील झापी, फलई , शिंधीदिगर, खडकी आदि भागातील नागरिकांना दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तोरणमाळला यावे लागते . ही येथील ग्रामस्थांसाठी नित्याची बाब आहे.

अतिदुर्गम भागातील तोरणा परिसरातील सर्व पाड्यांना सहजरित्या जाता यावे , दळणवळणाची सुविधा मिळावी त्याचप्रमाणे तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनाही या अतिदुर्गम भागात सहजरित्या जाता यावे यासाठी सुमारे सात वर्षापूर्वी सन २०१५ साली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात खा.डॉ.हीना गावीत यांनी भूमिपूजन करून केली. सुमारे वर्षभराच्या कालावधीत हे दोन्ही रस्ते पूर्ण होणे आवश्यक असतांनाही आज अखेर ते पूर्ण झालेले नाही .

ठेकेदाराने गेल्या काही महिन्यापूर्वीच काम बंद केले आहे. काम का बंद केले याची विचारणा परिसरातील पुढाऱ्यांनी व नागरिकांनी केली असता ठेकेदाराची माणसे उत्तरे देत नाहीत. तर ठेकेदाराचे दर्शनच होत नाही. मुळात अतिदुर्गम भागात हे रस्ते तयार होणार आहेत. संपूर्ण वनजमिनीत हे रस्ते होणार असल्याने या रस्त्यांना वनविभागाने परवानगी दिली नाही अशीही चर्चा परिसरात आहे. मुळात जर वनविभागाने परवानगी दिली नसेल तर कामाला का सुरुवात करण्यात आली हा ही एक प्रश्न आहे. ठेकेदारांने काम करतांना याच परिसरातील खडी व मुरूम याचा वापर केला आहे. अनेक डोंगरांना ठेकेदाराच्या या प्रतापामुळे अदृश्य होण्याची वेळ आली आहे. ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले असते तर या संपूर्ण पाड्यांवरील हजारो नागरिकांना याचा लाभ मिळाला असता. हलक्या वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही या मार्गावर धावू शकल्या असत्या व गेल्या ७३ वर्षांपासून सुरू असलेली येथील ग्रामस्थांची पायपीटही थांबली असती. त्याचप्रमाणे या भागाचे सौंदर्य, महत्त्व याची माहिती सहजरित्या पर्यटकांना उपलब्ध झाली असती .

आजूबाजूला खोल दरी ,वळणदार घाटरस्ता, जीवघेणी वळणे, अतिशय तीव्र उतार, अतिदुर्गम डोंगराळ भाग हे या रस्त्याचे वैशिष्ट्य असले तरी ठेकेदाराने नियमानुसार काम केलेले नाही त्याचप्रमाणे अपूर्णावस्थेत हे काम असल्याने येथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते एक प्रकारे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरला असून यापूर्वीही या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत. शनिवारी सकाळी झालेला अपघात हा आजपर्यंत सर्वात भीषण अपघात ठरला असून त्यात ठेकेदार व पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप ग्रामस्थांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. अपूर्ण अवस्थेत हा रस्ता असताना आजही तोरणमाळला येण्यासाठी येथील ग्रामस्थ पायपीटच करीत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन यास जबाबदार असलेल्या ठेकेदार व पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात या मार्गावर अनेक मोठे अपघात घडून बळींची संख्या वाढणार असल्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञासह जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Many people lost their lives due to incomplete road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.