खापरखेडा धरणाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:47 IST2021-02-07T11:46:39+5:302021-02-07T11:47:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात ...

खापरखेडा धरणाला गळती
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात यावा, यासाठी शिवकृपा पाणीवाटप संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, खा. डाॅ. हीना गावित व आ. डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन सादर केले.
शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवकृपा पाणीवाटप संस्था व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या खापरखेडा येथील लघु प्रकल्पाची निर्मिती १९७० ते १९७२ च्या काळात झाली. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पातून कोंढावळ, जयनगर, वडाळी या गावातील शेतकऱ्यांना लाभ झाला. मात्र, अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याचा परिणाम पाणी साठवणुकीवर झाला. यामुळे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १५० ते २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळीही खालावली जाते.
गेल्या तीन वर्षांपासून मुख्य कूपनलिका गाळामुळे बंद आहे. म्हणून शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणीपुरवठा होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी, शेतकरी राकेश हिरामण देवरे, लक्ष्मण माळी, निंबा काशिनाथ वैराळे, निखिल लालचंद माळी, सुरेश बुधा माळी, हिरामण विठ्ठल माळी आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खा. डॉ. हीना गावित आज धरणाची पाहणी करणार
कोंढावळ, जयनगर, वडाळी परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरणाऱ्या कोंढावळ येथील धरणाच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन खा.डॉ.हीना गावित यांना दिले होते. त्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष धरणाची पाहणी करण्यासाठी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी खा.डॉ.हीना गावित व आ. डॉ.विजयकुमार गावित भेट देणार असल्याची माहिती शिवकृपा पाणी वाटप संस्थेतर्फे देण्यात आली.
भूकंपाच्या धक्क्यामुळे धरण झाले खाली
२ जानेवारी रोजी कोंढावळसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे १५ दिवसांतच धरणात पाण्याचा जो साठा होता तो नदीत पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण धरण कोरडे पडले आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांचा रबी हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हवालदिल झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होते. मात्र, धरणाला गळती लागल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.