माघारीच्या अखेरच्या दिवशी मनधरणी आणि विनवणीची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:50 IST2019-12-31T12:50:12+5:302019-12-31T12:50:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या ...

माघारीच्या अखेरच्या दिवशी मनधरणी आणि विनवणीची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कसरत पहावयास मिळाली. नंदुरबारात एका गटाच्या महिला उमेदवार पाच मिनिटे उशीरा आल्याने त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, माघारीनंतर आता खºया अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील ५६ गट व ११२ गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची सोमवार, ३० रोजी अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. छाननीनंतर पाच दिवस माघारीसाठी मिळाले होते. परंतु या काळात कुणीही माघार घेतली नाही. शेवटच्या अर्थात सोमवारच्या दिवशी माघारीसाठी सहाही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते व संबधीत उमेदवारांची गर्दी झाली होती. सकाळी १० वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मुदतीत अनेक जणांनी माघार घेतली.
मनधरणी आणि विनवणी...
माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्यात आली. त्यासाठी विविध क्लृप्त्या लढविण्यात आल्या. राजकीय दबाव टाकण्यात आला. नातेगोत्याचा आसरा घेण्यात आला. कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीत, सोसायटी निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याला भूलून अनेकांनी माघार घेतली तर काहींनी कुठल्याही दबाव, आश्वासने यांना बळी न पडता आपली उमेदवारी कायम ठेवली. परिणामी काही गट व गणात डोकेदुखी कायम राहिली तर काही ठिकाणी संबधीत उमेदवारांना आपला उद्देश साध्य करता आला.
तहसील आवारांमध्ये गर्दी
माघारीसाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी १० वाजेपासूनच गर्दी झाली होती. ज्यांना माघार घ्यावयाची होती त्यांनी सरळ कार्यालयात येवून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज माघारीचे पत्र दिले. परंतु ज्या अपक्ष किंवा बंडखोरांना अर्ज मागे घ्यावयाचा नव्हता त्यांची मनधरणी करण्यासाठी आवारात संबधितांची चांगलीच कसरत होतांना दिसून आली. काहींना चहाच्या टपरीवर घेवून जात, काहींना झाडाखाली बसवत मनधरणी करण्यात आली.
अनेकजण नॉटरिचेबल
ज्यांना उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव होता त्यांनी सकाळपासूनच आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे संबधितांना त्यांच्या घरी, शेतात व त्यांच्या मित्र परिवाराकडे जावून त्यांचा शोध घ्यावा लागला. तरीही उपयोग न झाल्याने संबधितांचा हिरमोड झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले.
रनाळे गटातील अपक्ष महिला उमेदवार यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घ्यावयाची होती. परंतु त्या दुपारी ३ वाजून पाच मिनिटांनी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. संबधीत महिला उमेदवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश शिंत्रे, किशोर पाटील यांनी आत जावू देण्याची विनंती केली. परंतु तेथील बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. अखेर महिला उमेदवाराला परतावे लागले. त्यामुळे या गटात त्या अपक्ष म्हणून आता रिंगणात राहणार आहेत.