कारवाईची सूरी येऊ लागली गळा तरीही सरकारी बाबूंना लाचेचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:27+5:302021-02-23T04:48:27+5:30

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे ...

The knife of action began to fall, but the government officials were still fighting for bribes | कारवाईची सूरी येऊ लागली गळा तरीही सरकारी बाबूंना लाचेचा लळा

कारवाईची सूरी येऊ लागली गळा तरीही सरकारी बाबूंना लाचेचा लळा

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. खुर्चीला मान म्हणून अनेक जण काम होत आहे, या एकाच अपेक्षेने हातात असलेली रक्कम देऊन स्वत:चा मार्ग मोकळा करुन घेतात. शाॅर्टकट मार्गाने पैसे मिळतात, म्हणून अनेक जण लाचेची मागणी करून स्वत:चं भलं करून घेत आहेत. अशा लाचखोरांना धडा शिकवणारेही काही आहेत. त्यांच्या पुढाकाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सद्या जिल्ह्यात काम करत असून त्यांच्याकडून सातत्याने कारवाई करुन लाचखोरांवर गुन्हेही दाखल होत आहेत. विभागाला समक्ष किंवा निनावी माहिती दिल्यानंतर ही कारवाई होत आहे. २०१८ मध्ये अपसंपदा बाळगणाऱ्या दोघांवर विभागाने गुन्हे दाखल केले होते. दोघेही नंदुरबार शहरातील होते. चाैकशीअंती अपसंपदा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आले आहे. दरम्यान कमी श्रमात अधिक पैसा मिळू लागल्याने वाढीव खर्च करण्याच्या नादात अनेक जण हिमतीने लाचेची मागणी करतात. अशा तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची पूर्णपणे चाैकशी करूनच पुढील कारवाई होत आहे. गेल्या चार वर्षात ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये सर्वाधिक संख्या ही महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे. त्याखालोखाल पोलीस व इतर विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. किरकोळ रकमेच्या मागणीचे हे गुन्हे आहेत.

महसूल विभागात सामान्य नागरिकांची अनेक प्रकारची कामे असतात. या कामांसाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच इतर कार्यालयांमध्ये वेळोवेळी जाणाऱ्यांना लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. भूमी अभिलेख विभाग, पोलीस दलातील किरकोळ कामांसाठी अनेकांना लाच देणे योग्य न वाटल्याने त्यांनी तक्रारी दिल्यानंतर लाचखोरांनाना ताब्यात घेण्यात आले होते.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या कारवायांमध्ये सर्वच विभागातील कर्मचारी आहेत. यात सर्वाधिक कर्मचारी हे महसूल विभागाचे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यात तब्बल पाच जणांची गुप्त चाैकशी सुरू आहे. तर दोघांवर कारवाईची शक्यता आहे. हे पाच जण कोण याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी लाचखोरीतून अपसंपदा गोळा करू पाहणाऱ्यांवरच ही कारवाई होणार असे निश्चित आहे.

शासनाकडून कर्मचाऱ्यांना इमानदारीने कर्तव्य पार पाडून सामान्यांची सेवा करावी या उद्देशाने सातत्याने समुपदेशन करण्यात येते. परंतु बदलत्या काळानुसार खर्च करण्याची सवय झालेल्यांकडून लाचखोरीला वाव मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. लाचेची मागणी करणाऱ्या विरोधात लिखित तक्रारी आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात लाचेची मागणी करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी विभागाकडून हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या लाचेच्या मागणीची तक्रार किंवा माहिती देता येणार आहे. विभागाकडून दरवर्षी यासाठी विशेष पंधरवाड्याचे आयोजन करून शाळा, महाविद्यालय, बसस्थानके यासह विविध सार्वजनिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येऊन लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जातो.

चार वर्षात सातत्याने लाचखोरांना ताब्यात घेतले जात आहे. येत्या काळातही हे सत्र सुरूच राहणार आहे. नागरिकांनीही लाचेच्या मागणीला प्रतिसाद न देताना पुढाकार घेतल्यास या समस्येचे निराकारण होऊन स्वच्छ प्रशासन कामाला येऊ शकते. प्रत्येकाने याबाबत काळजी घेत कामकाज करावे.

- शिरीष जाधव, उपअधीक्षक,एसीबी, नंदुरबार

Web Title: The knife of action began to fall, but the government officials were still fighting for bribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.