नवापूरात दोन लाख काेंबड्यांची कलींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:46 IST2021-02-10T12:45:54+5:302021-02-10T12:46:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर बाधित ८ कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची ...

नवापूरात दोन लाख काेंबड्यांची कलींग
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर बाधित ८ कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यांतर्गत तीन दिवसात दोन लाख २१ हजार कोंबड्यांची किलींग करण्यात आली असून पशुसंवर्धन विभागाची ९० पथके याठिकाणी तळ ठोकून आहेत.
पहिल्या दिवशी ४० हजार, दुस-या यादिवशी एक लाख ५ हजार ३०३ तर मंगळवारी तिसऱ्या दिवशी शिष पोल्ट्री १० हजार ४०४ आमलीवाला पोल्ट्री २४ हजार ७६०,पालावाला पोल्ट्री ३६ हजार,परवेज पठाण पोल्ट्री २३ हजार ६३६ असे एकूण ८४ हजार ७८७ कुकुट पक्षी नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची ९१ अधिक पथके नवापूरात दाखल झाली आहेत. शहरातील १५ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. १५ वर्षांनंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नवापूरमधील कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा पूर्ण ठप्प होण्याचा मार्गावर आहेत.
बुधवारी नवापूर तालुक्यातील पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन झाले त्यात अंडी मोजणी करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक, पशुसंवर्धन कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यातील चार कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळ प्रयोगशाळेने बाधित असल्याचा अहवाल दिल्यानंतर तीन दिवसात जवळपास सव्वा दोन लाख पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी नाशिक विभागातून पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९१ पथके दाखल झाली आहेत. सोमवारपासून पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. दुसरीकडे प्रशासनाने या केंद्रांच्या १० किलोमीटर परिघातील जवळपास सर्वच कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार असून प्रशासनाने या केद्रांवर नजर ठेवली आहे. मुळात नवापूरमधील या केंद्रातील ३४ हजारहून अधिक कोंबडय़ांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. या आजाराचा मृत्यू दर अधिक आणि प्रादुर्भाव जलद होत असल्याने प्रशासन सतर्कतेने काम करीत आहे.
नवापूरातील बर्ड फ्ल्यू मोहिमेत नाशिक महानगरपालिकेचे यंत्रणा व साधन सामग्री मागवण्यात आली आहे.सदर यंत्रणा तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांची विष्टा काढण्यासाठी काम करणार आहे.
सर्वात मोठे ऑपरेशन
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू नवापूरात सुरू झाले आहे. तिसऱ्या दिवसासाठी नवापूर शहरात नाशिक विभागातील जळगाव १६, नाशिक २७,अहमदनगर ३६ तर नंदुरबार येथील १२ असे ९१ पथक कार्यरत झाले आहे. एका पथकात १ पशुधन विकास अधिकरी,१ पशुधन पर्यवेक्षक, २ परिचर,असे पाच असे एकूण ३८९ कर्मचारी किलिंग ऑपरेशनात सहभागी झाले आहे. सोबतच ९५ पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
नवापुर तालुक्यातील बर्ड फ्ल्यू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी नवापूरात दाखल झाले आहे याची निवासीची व्यवसाय तीन ठिकाणी करण्यात आली आहे.नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचारी निवासात तर देवळफळी भागातील शासकीय मुलांचे वसतिगृहात तर उर्वरित सिनियर काॅलेजच्या वसतिगृह व्यवस्था केली आहे.
कर्मचा-यांना त्रास
किलिंग मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून घामाने मोठा त्रास होत असल्याने व अनेक कर्मचाऱ्यांना उलटी झाल्याची समस्या जाणवत आहे. आमलीवाला पोल्ट्रीतील चार कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याने तात्काळ उपचार करण्यात आला.त्यासाठी सर्व पोल्ट्रीमध्ये आरोग्य पथकाचे डाॅक्टर नर्स अशी टिम कार्यरत आहे. त्यांच्याकडून तातडीने उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आतापर्यंत प्राण्यांमधून माणसे बाधित होण्याची जगातील संख्या ही ८६२ असून त्यामुळे ४५५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात मात्र पक्ष्यांमधून माणसात हा आजार जडण्याचे प्रमाण तसे नसल्याचे दिसून आले आहे. ७० अंशापेक्षा अधिक तापमानात चिकन, अंडी उकळल्यास ते सुरक्षित होत असल्याने भारतात बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तरी देखील नवापूरमधील पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेशी निगडित कर्मचारी आणि कुक्कुटपालन केंद्रातील कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून टॅमी फ्लूचा डोस दिला जात आहे. पक्ष्यांची संख्या मोठी असल्याने ते नष्ट करण्याच्या प्रक्रियेला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
-डाॅ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार.