नवापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला बांगड्यांचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:32+5:302021-02-05T08:07:32+5:30
पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत मुख्याधिकारी यांच्या दालनात विरोधक व नागरिकांनी गदारोळ केला. मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे ...

नवापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला बांगड्यांचा अहेर
पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत मुख्याधिकारी यांच्या दालनात विरोधक व नागरिकांनी गदारोळ केला. मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी विकास कामांवर लक्ष देत नसल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले धारेवर धरले व अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला.
नवापूर शहरातील गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा येथे डांबरीकरणाचे काम तात्काळ थांबविण्याबाबतचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना प्रभाग सहा कुंभारवाडा येथील नागरिकांनी दिले. या वेळी भारतीय जनता पाटीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी उपाध्यक्ष अनिल वसावे, जयंती अग्रवाल, हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाने, नीलेश प्रजापत, जीतू अहिरे, स्वप्निल मिस्त्री, घनशाम परमार, कमलेश छत्रीवाला, कुणाल दुसाने, अनिल सोनारसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी तीन वेग-वेगळे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कुंभारवाडा ते नवनीत लोहार यांच्या घरापर्यंत डांबरीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे करावे. २० वर्षांपूर्वीची असलेली गटार लाईन नवीन करून देणे, रस्त्याची उंची वाढल्याने नागरिकांच्या घराच्या पायऱ्या रस्त्यामुळे दाबल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात घरात पाणी शिरते, डांबरीकरणाचे काम रस्त्यावर न करता रस्त्याचे अर्धाफुट खोदकाम करून करावे. योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपासह नागरिकांनी दिला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगर पालिकेची राहील. यानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा रस्त्यांची पहाणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित प्रशासनाला यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सूचनाही केल्या. नवापूर शहरातील राजकीय वातावरण रस्ता डांबरीकरणामुळे चांगले तापले आहे. पालिकेतील विरोधकांचे मौनदेखील शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
नागरिकांचा आग्रह आहे की, दर्जेदार रस्ता बनवून चांगल्या नागरी सुविधा पालिकेने पुरवणे गरजेचे आहे.