जिर्ण घरे व इमारतींना नोटीसा देऊनही जैसे थे परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:04 IST2020-08-18T12:04:30+5:302020-08-18T12:04:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाळ्यापूर्वी शहरातील पडक्या व जिर्ण इमारतींबाबत घरमालकांना नोटीसा देऊनही अनेक ठिकाणी जैसे थे असल्याचे ...

जिर्ण घरे व इमारतींना नोटीसा देऊनही जैसे थे परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाळ्यापूर्वी शहरातील पडक्या व जिर्ण इमारतींबाबत घरमालकांना नोटीसा देऊनही अनेक ठिकाणी जैसे थे असल्याचे चित्र आहे. पालिकेचा बांधकाम विभाग दरवर्षी केवळ नोटीसा देऊन मोकळे होतो. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अशा घरांना गळती लागली होती. परंतु वेळीच पावसाने विश्रांती घेतल्याने काही अनर्थ झाला नाही.
पावसाळ्याच्या सुरुवातीला अर्थात मे महिन्यात दरवर्षी पालिका पडक्या घर, इमारत मालक तसेच उतारावरील आणि नदी, नालाकाठी राहणाऱ्या नागरिकाना वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपात नोटीसा बजावतत असते. यंदा देखील तश प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. परंतु एकाही घरमालकाने, इमारत मालकाने त्याबाबत गांभिर्याने घेतले नसल्याची स्थिती आहे.
सर्व्हेक्षण आवश्यक
पडके घर किंवा इमारतींचे शहरात सर्व्हेक्षण होणे आवश्यक असते. परंतु पालिकेकडे अशा प्रकारची यादी किंवा माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यंदा १५ पेक्षा अधीक जणांना नोटीसा बजावण्यात आल्या.
वास्तविक प्रत्येक प्रभागनिहाय अशा प्रकारचे सर्व्हेक्षण होणे आवश्यक असते. तसे झाले नाही किंवा होत नाही. त्यामुळे शहरात अशा प्रकारच्या किती इमारती आणि घरे आहेत त्याची माहिती उपलब्ध होत नाही.
दरवर्षाची स्थिती
पडक्या इमारती अर्थात घरांची स्थिती अगदीच एक किंवा दोन मजले यापर्यंत सिमीत आहे. त्यापेक्षा उंच इमारती शहरात नाहीत. त्यामुळे अशा घर मालकांनी अशा ठिकाणी भाड्याने घरे किंवा खोल्या दिलेल्या आहेत. त्या खाली करणे म्हणजे मोठे दिव्य असते. शिवाय स्वत: भाडेकरू देखील आपल्य जबाबदारीवर अशा ठिकाणी राहत असतात. त्यामुळे घरमालकांचाही नाईलाज होत असल्याचे चित्र आहे. परिणामी अशा इमारतींमध्ये पावसाळा संपूनही घरभाडेकरू राहत असल्याचे दिसून येते.
उतारावरील घरे
नंदुरबारात उतारावरील घरांची समस्या देखील आहे. साक्रीनाका पाण्याच्या टाकीपासू ते थेट वाघेश्वरी देवी मंदीर टेकडीपर्यंत अशा घरांची समस्या कायम आहे. काही ठिकाणी कच्ची तर काही ठिकाणी पक्की अतिक्रमणे आहेत. अशा ठिकाणी उतारावरून पाणी वाहने, माती वाहून येणे, दरडी कोसळणे असे प्रकार होत असतात. शहरात सुदैवाने मोठी घटना घडली नाही. परंतु यापुढील काळासाठी दक्षता बाळगणे देखील आवश्यक आहे.
संततधारमुळे धोका
पावसाचे अतीप्रमाण आणि संततधार यामुळे कच्ची व पडकी घरे, इमारती यांना धोका निर्माण होतो. नंदुरबारसह परिसरात गेल्या आठडयात संततधार पाऊस झाला. त्यामुळे कच्च्या घरांना गळती लागली होती. उतारावरून पाणी वाहण्याचे प्रमाण देखील वाढले होते. उतारावरून गाळ आणि माती वाहून आल्याने उतारावरील अनेक घरांच्या परिसरात आणि गल्लींमध्ये मातीचा थर साचला होता.
शहरातील जिर्ण इमारती व घरांचे नव्याने सर्व्हेक्षण करावे.
जिर्ण घरमालकांसह शेजारी राहणाऱ्यांचेही जीव यामुळे धोक्यात येतात.
दरवर्षी पालिका केवळ नोटीसा देऊन मोकळे होते. त्याऐवजी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.
नंदुरबारसह, शहादा पालिकेतही हीच स्थिती आहे.