सुरळीत रेशन वाटपासाठी भरारी पथकांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:51 PM2020-04-05T12:51:22+5:302020-04-05T12:51:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची नियुक्ती केली असून हे पथक काळाबाजारावर वॉच ठेवणार आहे. असे असले तरी या पथकांची कडक भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन महिन्यांचे रेशन उपलब्ध करून दिले आहे. आता तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोफत रेशन उपलब्ध करून देणार आहे. तालुकास्तरावर मागील उपलब्ध झालेले नियतनाचेच सद्या वाटप सुरू आहे. हे नियतन अधिक सुरळीत होण्यासाठी तसेच पुढील रेशन वाटपाच्या पार्श्वभूमीवर येथील महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नायब तहसीलदारांच्या पर्यवेक्षणाखाली चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
यात तळोदा मंडळ नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मंडळ अधिकारी एस.बी. पाटील, बोरद मंडळाचे नायब तहसीलदार रिनेश गावीत, मंडळ अधिकारी माया मराठे, प्रतापपूर मंडळाचे श्रीकांत लोमटे व मंडळ अधिकारी सी.बी. नायक, सोमावल मंडळ नायब तहसीलदार रामजी राठोड, मंडळ अधिकारी डी.एस. निकम यांच्या सोबत संबंधीत गावांचा तलाठ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे भरारी पथक आपल्या मंडळातील रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना सुरळीत धान्य दिले जात आहे की नाही यावर वॉच ठेवणार आहेत. याशिवाय प्रति व्यक्तीस पाच किलो प्रमाणे धान्य वितरित होत आहे का? या प्रकरणी प्रत्यक्ष दुकानदाराकडे पडताळणी करणार आहे. या उपरांत संबंधीत दुकानदाराकडे अनियमितता आढळून आली तर थेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पथकास देण्यात आले आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरीब घटकांना पुरेसे रेशन मिळण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. कारण अधिकाऱ्यांच्या भरारी पथकांबरोबरच गावपातळीवर ग्राम समितीचीही नेमणूक केली आहे. या ग्रामसमितीत संबंधीत गावाचा सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल अशा पाच जणांचा समावेश आहे. ही समिती एप्रिल ते जूनपर्यंत शासनाकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिले जाणारे मोफत रेशनच्या वाटपावर प्रत्यक्ष दुकानदाराकडे उपस्थित राहून देखरेख करतील. या उपरांतही जर काळा बाजाराच्या तक्रारी आल्या तर समितीलाही जबाबदार धरुन कठोर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.