पुराव्याअभावी बाबासाहेबांच्या तळोदा भेटीचा इतिहास काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:47+5:302021-04-14T04:27:47+5:30
३० जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोदा शहरात भेट दिल्याचे सांगितले जाते. बाबासाहेब न्यायालयाच्या कामानिमित्त धुळे येथील ...

पुराव्याअभावी बाबासाहेबांच्या तळोदा भेटीचा इतिहास काळाच्या पडद्याआड
३० जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोदा शहरात भेट दिल्याचे सांगितले जाते. बाबासाहेब न्यायालयाच्या कामानिमित्त धुळे येथील वकील प्रेमसिंग तवर यांच्याकडे १९३७ साली आले होते. त्यावेळेस २०, ३० व ३१ जुलै १९३७ रोजी धुळे येथील प्रसिद्ध लळींग बंगल्यावर ते थांबल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ३१ जुलै रोजी लळींग येथील लांडोर बंगल्यावर भीमस्मृती यात्रा भरते व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लळींग बंगल्यावर हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक बडे नेते, कार्यकर्तेही दरवर्षी ३१ जुलैला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावतात.
याच लळींग दौऱ्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तळोदा येथे भेट दिल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते; परंतु याबाबत अधिकृत नोंद नसल्याने बाबासाहेबांची ऐतिहासिक तळोदा भेट इतिहासात दुर्लक्षितच राहिली आहे. ३० जुलै १९३७ रोजी नावेच्या (होडीच्या) सहाय्याने सज्जीपूर-हातोडामार्गे ते तळोदा शहरात आले होते. तळोदा शहराचे जहागिरदार अमरजित बारगळ यांचे आजोबा शंकरराव बारगळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले होते. या भेटीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शहरातील एका छात्रालयाला भेट दिल्याचे सांगितले जाते.
तळोदा शहरातील स्व.बबन माळी, स्व.संभू चौधरी अशा प्रसिद्ध पहेलवानांना घडवणारे स्व.रणछोड देवराम माळी हे या छात्रालयाचे गृहपाल होते. या भेटीत बाबासाहेबांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्याशी चर्चा केली होती व यावेळी त्यांनी छात्रालयाच्या शेरेबुकमध्ये अभिप्राय नोंदवले. ही घटना स्वतः स्व.रणछोड गुरुजी यांनी त्यांना सांगितली असल्याची आठवण जहागिरदार अमरजित बारगळ सांगतात. १९९७ मध्ये रणछोड गुरुजींचे निधन झाल्याने ऐतिहासिक घटनाक्रमाचा एकमेव वारसदार व पुरावा पडद्याआड गेला.
तळोदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळोदा भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या तळोदा भेटीबाबत इतिहासकारांकडून संशोधन होणे गरजेचे असून, बाबासाहेबांची ही तळोदा भेट दंतकथा बनून राहू नये, अशी आंबेडकरी अनुयायी जनतेची भावना आहे.
स्व.रणछोड गुरुजींचे स्मरण टिपण
बाबासाहेबांच्या तळोदा भेटीबाबत स्व. रणछोड देवराम माळी यांचे एक स्मरण टिपण काही महिन्यांपूर्वी त्यांचे वारस असणारे त्यांचे नातू सुनील सूर्यवंशी यांना सापडले. घराचे सामान शिफ्ट करीत असताना कागदपत्रांची आवराआवर करताना त्यांना स्व.रणछोड गुरुजींचे हे स्मरण टिपण हाती लागले. बाबासाहेबांच्या तळोदा भेटीबाबत पुरावा म्हणून एकही दस्तऐवज नसताना हे स्मरण टिपण सापडल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र बाबासाहेबांची लळींग येथील भेट व स्व.रणछोड गुरुजींनी स्मरणपत्रात केलेली नोंद यांच्या वर्षात तफावत दिसून येते. स्व.रणछोड गुरुजींनी हे स्मरणपत्र १ जुलै १९९३ रोजी लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘तळोदे, जि.धुळे सन १९३२ ते १९३६ या कालावधीत माझ्याकडे सरकारी दिल्ली बोर्डिंग असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बोर्डिंगला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन कार्यकर्ते होते. त्यांनी भिल्ल समाजाच्या परिस्थितीसंबंधी मुलांना अनेक प्रश्न विचारून माहिती मिळवली. शेरेबुकात नोंद केली.’ पत्राच्या शेवटी खाली त्यांनी स्वतः चे नाव व सही करून पत्र लिहीत असताना त्यांच्या वयाची नोंद केली आहे.
चार वर्षांपूर्वी झाला प्रेरणा मेळावा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळोदा भेटीला ८० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तत्कालीन परिवर्तनवादी संघर्ष समितीच्यावतीने चार वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणा मेळावा घेण्यात आला होता. यातून बाबासाहेबांच्या तळोदा भेटीच्या स्मृतींना उजाळा दिला होता; परंतु तो पहिला व शेवटचा प्रयत्न ठरला. या मेळाव्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तळोद्याच्या भेटीबाबत दस्तऐवज व अधिकृत नोंद मिळवण्यासाठी दिल्लीतील संग्रहालयात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन अपरांती यांनी दिले होते; मात्र त्यानंतर बाबासाहेबांच्या तळोदा भेटीबाबत संशोधनाकरिता स्थानिक पातळीवरूनदेखील पाठपुरावा झाला नसल्याचा अनुभव आहे.