रात्री होणाऱ्या लिलावामुळे अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:27+5:302021-02-05T08:08:27+5:30
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री लिलाव करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त ...

रात्री होणाऱ्या लिलावामुळे अडचण
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री लिलाव करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून रात्री वाहने मिळत नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पोहोचत येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांमुळे चिंता
धडगाव : तालुक्यातील वडफळ्या येथे शेळ्या मयत झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. जंगलातील झरे आटत असल्याने जनावरे गाव-पाड्यांच्या जवळ येत आहेत. यातून पाळीव पशुंवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
उपसा सिंचन योजनेला गती द्यावी
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यंदाच्या वर्षात ही योजना व्हावी, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने कामाला गती देण्याची सूचना करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. योजनेचे काम काहीअंशीच शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीस गस्तीची गरज
नंदुरबार : शहरातील होळ तर्फे हवेली शिवारातील विविध वसाहतींमध्ये पोलीस गस्त वाढवण्याची रहिवाशांची मागणी आहे. या भागात भुरटे चोर रात्री भटकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
सुशोभिकरण सुरू
नंदुरबार : शहरातील विविध भागात सध्या सुशोभिकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील दुभाजकांवर वारली पेंटिंग करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील विविध चाैकांमध्ये साफसफाईही करण्यात आली आहे.
गाईने उडवली नागरिकांची झोप
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगर दोन परिसरात एका गायीमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून लाल रंगाची गाय वसाहतीतील वाहनधारक किंवा पायी चालणाऱ्यांवर धावून जात आहे. यातून एक दोघांना किरकोळ जखमाही झाल्या आहेत. गायीचा बछडा काही दिवसांपूर्वी या परिसरात मयत झाला होता. तेव्हापासून गाय दिसेल त्याच्यावर अगांवर धावून जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पथदिवे बंदच
नंदुरबार : शहरातील गुरव चाैक ते बायपास रोड दरम्यान तयार केलेल्या मार्गावरचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. याबाबत अनेकवेळा सांगूनही पथदिवे सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत नागरिक पायी फिरण्यासाठी जातात.
बॅटऱ्या खराब
धडगाव : दुर्गम भागात दूरसंचार विभागाने लावलेल्या टाॅवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या असल्याने वेळावेळी टाॅवर बंद होऊन सेवा ठप्प होत आहे. याबाबत नागरिकांनी दूरसंचार विभागाला माहिती देऊनही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. दुर्गम भागात दररोज सेवेचा बोजवारा उडत आहे.
रुग्णालयांमध्ये सुविधा द्याव्यात
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधा देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत असताना, चांगल्या दर्जाचे बेड तसेच विविध सुविधा मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.