मोठा मारुतीनजीकचे उकिरडे हटवा नंतरच स्वच्छता रँकींगच्या वल्गना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:21 PM2020-02-14T12:21:01+5:302020-02-14T12:22:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोठा मारुती मंदीर अर्थात टाऊन हॉल ते देसाईपूरा पर्यंतच्या रस्त्यावरील उकिरडे, गटारीचे पाणी, जनावरांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोठा मारुती मंदीर अर्थात टाऊन हॉल ते देसाईपूरा पर्यंतच्या रस्त्यावरील उकिरडे, गटारीचे पाणी, जनावरांचे मलमूत्र बंद करून दाखवावे व नंतरच स्वच्छ भारत अभियानात नंदुरबारची रँक वाढवल्याच्या फुशारक्या मारव्या असे आव्हान पालिकेतील विरोधी गटातर्फे सत्ताधारी गटाला करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर पालिका सभापती व नगरसेवकांची नावे गाळून त्यांचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ अभियानात नंदुरबार पालिकेला २९ वा रँक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु शहरातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य पालिकेला हटवता आलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात नंबर आल्याचा अभिमान पालिकेने तेव्हाच बाळगावा, जेव्हा मोठा मारूती मंदीर ते पुढे देसाईपुरापर्यंतच्या रस्त्यावर मैलायुक्त पाण्याचा फैलाव होणार नाही. या ठिकाणी भर रस्त्यावर उकीरडे आहेत.
जनावरांच्या कचरा, मलमूत्र यातून आणि खराब पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागते. पावसाळ्यात तर नरकयातनाच भोगाव्या लागतात. याला स्वच्छता अभियानाचे यश म्हणणार काय? जागोजागी कचऱ्याचे ढिग व त्यावर मुक्तपणे गुरे ढोर, कुत्रे, वराहांचा वावर या बाबी थांबतील का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
सभापती, नगरसेवकांचा अपमान
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकांवर पालिकेच्या विषय समिती सभापतींची नावे नाहीत, नगरसेवकांची नावे नाहीत, एकमेव शिवसेनेच्या सभापती आहेत त्यांचेही नाव नाही. हा सभापती आणि नगरसेवकांचा एकप्रकारे अपमानच आहे. पालिकेचा कार्यक्रम असून या घटकांची नावे न टाकण्यामागे उद्देश काय? असा सवालही उपस्थित केला गेला आहे.
नगरपालिका इमारतीला कुणी विरोध केला, त्यांची नावे जाहीर करावी. पालिकेची सत्ता वर्षानुवर्ष ताब्यात असतांना अतिक्रमण झालेच कसे असा सवालही पत्रकात भाजप नेते डॉ.रवींद्र चौधरी, गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी उपस्थित केला आहे.