कावळ्यांचा मृत्यू जखम व पतंगाच्या दोऱ्यामुळे झाल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST2021-01-25T04:32:30+5:302021-01-25T04:32:30+5:30
प्रकाशा येथील बॅरेज कार्यालय परिसरात चार ते पाच कावळे अचानक मृत्युमुखी पडल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त ...

कावळ्यांचा मृत्यू जखम व पतंगाच्या दोऱ्यामुळे झाल्याचा अंदाज
प्रकाशा येथील बॅरेज कार्यालय परिसरात चार ते पाच कावळे अचानक मृत्युमुखी पडल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. चार ते पाच कावळ्यांपैकी काही कुत्र्यांनी उचलून नेले तर दोन कावळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी गणेश धनगर यांना सापडले. त्यांनी हे मृत झालेले कावळे पुढील तपासणीसाठी शहादा येथे नेले होते. शनिवारी पशुधन विकास अधिकारी अभिषेक पेंढारकर, तालुका सहायक आयुक्त सागर परदेशी, डॉ. महेश तळेकर, डॉ. आर. के. शिंदे यांनी मृत कावळ्यांची तपासणी केली असता सांगितले की, एक कावळा जखमी होता तर दुसरा पतंगाच्या दोऱ्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिली. त्यानंतर या दोन्ही मृत कावळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. शहादा येथील पशुचिकित्सालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रकाशा येथील बॅरेज कॉलनी परिसरात येऊन पाहणी केली. या वेळी अन्यत्र कुठेही मृत्युमुखी पडलेले कावळे दिसून आले नाहीत. त्यामुळे येथे बर्ड फ्लू नाहीच, असे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, येथील बॅरेज कॉलनी व कार्यालय परिसरात घाणीचे मोठे साम्राज्य आहे. या परिसरात पाच विभागाची कार्यालये असून परिसराची स्वच्छता करण्याची गरज आहे.