बाजारात चैतन्य, पण काळजी घेणेही गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:03 PM2020-11-14T12:03:35+5:302020-11-14T12:03:44+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळी पर्वानिमित्त शुक्रवारी बाजारता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे बाजारात चैतन्य पसरले ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळी पर्वानिमित्त शुक्रवारी बाजारता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे बाजारात चैतन्य पसरले आहे. कोरोना व लाॉकडाऊनंतर प्रथमच एवढी गर्दी आणि उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसतांना नागरिकांची बाजारातील गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा अभाव मात्र चिंता निर्माण करणारा ठरत आहे.
दिवाळीचा उत्साह व चैतन्य जिल्हाभरात दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शुक्रवारी तर गर्दीने उच्चांक मोडला. सकाळी नऊ वाजेपासूनच बाजारात गर्दी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत ती कायम होती. रेडीमेड कपडे, हॅण्डलूम, इलेक्ट्राॉनिक वस्तू, सराफा दुकान येथे गर्दी दिसून येत होती. अनेक दुकानांमध्ये ग्राहकांना वेटींग करावी लागत होते. विशषेत: कपड्यांचा दुकानात हे चित्र होते.
शनिवारी लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तू अर्थात झेंडूची फुले, केरसूनी, लाह्या, बत्तासे यासह मिठाई खरेदीसाठी गर्दी झाली होती.
झेंडूची फुले यंदा बाजारात कमी होती. अतीवृष्टीमुळे यंदा झेंडूची शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा झेंडू चांगलाच भाव खाऊन जात आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीला देखील झेंडूचे भाव चढतेच होते. शुक्रवारी तब्बल १७० ते २०० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली. भाव जास्त असला तरी पुजेसाठी तोरण बांधण्यासाठी झेंडूची फुले खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. कोरोनानंतर प्रथमच बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी व त्यातून सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा बोजवारा, अनेकांच्या तोंडाला मास्क नसणे यामुळे अनेकजण कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सण, उत्सवाच्या आनंदात कोरोनाला विसरू नका, प्रत्येकाने काळजी घ्या असे आवाहनही करण्यात आले.