शहादा तालुक्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:15+5:302021-04-12T04:28:15+5:30
शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

शहादा तालुक्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी
शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले, तालुक्याला एक खासदार व दोन आमदार असतानाही आज तालुक्यातील नागरिक ऑक्सिजन बेड व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकंती करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा थेट जनतेशी संपर्क असल्याने प्रशासनाने उपाययोजना करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवला पाहिजे. मात्र असे होत नसल्याने उपायोजना फोल ठरत आहे. परिस्थिती गंभीर झाली असताना अशावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सहभागी करून उपाययोजना राबविल्या पाहिजे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमण झाल्यापासून आतापर्यंत पालकमंत्र्यांनी शहादा तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत एकही बैठक घेतली नाही. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विचार विनिमय केला नाही. यामुळे भविष्यात परिस्थिती गंभीर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहाद्यात ऑक्सिजनचे १०० बेडचे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रकाशा येथे एक हजार बाधितांसाठी विलगीकरण कक्ष केला जाणार आहे. मात्र याला बराच कालावधी लागणार असल्याने आजची परिस्थिती पाहून त्यावर उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शहादा नगरपालिकेमार्फत मंगळवारपासून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. याठिकाणी शहरातील विविध कोविड सेंटरमधील स्थिती, औषध, इंजेक्शनचा साठा व रुग्णवाहिकांबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शहादेकर जनता शहरातील राजकारणीही संयमी आहेत. गेल्या तीन दिवसापासून मयतांची संख्या वाढत असल्याने अमरधाम येथे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत परिसरातील नागरिकांचे वाद निर्माण होत आहेत. या परिसरातील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी तात्काळ दुसरी व्यवस्था करण्यात येईल. यासाठी गॅस दाहिनीचीही व्यवस्था करण्याचा मानस आहे. प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून निर्णय घेत आहेत. शहरात विविध ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. अनेक वसाहतीतील नागरिकांनी स्वतःहून बॅरिकेटींग केले असल्याने रुग्णाला रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होत आहे. पालकमंत्र्यांसह प्रशासनाने नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी मांडले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, संतोष वाल्हे आदी उपस्थित होते.