सातपुड्याच्या दुर्गम भागात लसीकरणासाठी प्रशासनापुढे आव्हानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:38+5:302021-06-04T04:23:38+5:30
नंदुरबार : राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात अवघड असलेल्या सातपुड्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात लसीकरणासाठी प्रशासनापुढे आव्हानच ठरले आहे. त्यासाठी लसीकरण करणाऱ्या यंत्रणेला ...

सातपुड्याच्या दुर्गम भागात लसीकरणासाठी प्रशासनापुढे आव्हानच
नंदुरबार : राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात अवघड असलेल्या सातपुड्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात लसीकरणासाठी प्रशासनापुढे आव्हानच ठरले आहे. त्यासाठी लसीकरण करणाऱ्या यंत्रणेला प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्याला काही प्रमाणात लोकांकडूनही प्रतिसाद मिळत असून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात आठ टक्क्यापेक्षा अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ८० टक्के भाग हा अतिदुर्गम भागात आहे. या भागातील गावे पाड्यापाड्याने विस्तारली असल्याने एका गावाचे क्षेत्रफळ आठ ते दहा चौरस किलोमीटर आहे. काही गावे त्याहीपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तारली आहेत. पाड्यांमधील घरेदेखील शेतातच असल्याने एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंतचे अंतरही १०० ते २०० मीटरपेक्षा अधिक आहे. जवळपास ७०० पेक्षा अधिक पाड्यांपर्यंत रस्तेच नाहीत. नर्मदा काठावरील गावांची स्थिती तर त्याहीपेक्षा गंभीर. १३ गावांना टापूचे स्वरुप आले आहे. या गावांना बोटीने किंवा बार्जने जावे लागते. अशा दळणवळणाच्या दृष्टीने अवघड असलेल्या या परिसरात नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा प्रश्नही गंभीर आहे. त्यातच साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आणि अज्ञानतेमुळे वाढलेल्या अंधश्रद्धेचा प्रश्न अजूनच बिकट. अशा भागात लसीकरणाची मोहीम राबविणे प्रशासनापुढे आव्हानच आहे.
मार्च महिन्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी लसीकरणाच्या पाहणीसाठी भेट दिली होती. त्यावेळी धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात जवळपास दीडशेपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात आले होते. गंमतीची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपताच लसीकरणासाठी आलेले अनेक जण मंडपातून लसीकरण न करताच घरी निघून गेले होते. त्यानंतर मात्र दीड महिना लसीकरणाची मोहीम या भागात ठप्पच होती. परंतु मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रशासनाने या भागात मोहीम गतीमान केली असून विविध क्लृप्त्या राबवून लोकांना लसीकरणासाठी राजी करुन त्यांचे लसीकरण केले जात आहे.
लसीकरणासाठी ज्या गावात रस्ता आहे तेथे मंडप टाकून शिबिर घेतले जाते. त्या भागातील शिक्षक, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, स्थानिक पदाधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व सांगतात. तेथेच लाभार्थींची कागदावर नोंदणी करतात आणि त्यांना शिबिरात येण्यास प्रवृत्त केले जाते. ज्याठिकाणी लसीकरणाचे शिबिर असते त्याठिकाणी नेटवर्कची अडचण असल्याने लसीकरणाच्या ठिकाणापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर किंवा काही ठिकाणी तर त्याहीपेक्षा अधिक लांब अंतरावर ज्याठिकाणी नेटवर्क आहे ते ठिकाण निवडले जाते. त्याच ठिकाणी एखाद्या झाडाखाली लसीकरणासाठी नोंदणी होते. तेथून स्कूलबसद्वारे नागरिकांना लसीकरण असलेल्या ठिकाणी नेण्यात येते व लसीकरण झाल्यानंतर त्याच बसने परत आणले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी अधिक वेळ जात असल्याने नागरिकांसाठी पाणी, बिस्कीट आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाते.
नर्मदा काठावर बार्जने जावे लागते. त्यासाठी काही अंतर पायीही चालावे लागते. त्यामुळे या भागात मंडप सुविधा नेणे अवघड असल्याने एखाद्या झाडाखाली अथवा सोयीच्या ठिकाणी जाऊन लोकांना खाटेवर बसवून किंवा घरातील बाकावर बसवून लसीकरण केले जाते.
अक्कलकुव्याला नऊ तर धडगाव सहा टक्के लसीकरण
सातपुड्यातील सर्वात दुर्गम असलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद आहे. अक्कलकुवा तालुक्यातील लोकसंख्या दोन लाख ८७ हजार १४७ असून १८ वर्षावरील एक लाख २० हजार ६०२ तर ४५ वर्षावरील ८६ हजार ७१८ असे लसीकरणासाठी दोन लाख सात हजार ३२० नागरिकांचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यापैकी फक्त १९ हजार ३६६ म्हणजे ९.३ टक्के लसीकरण आतापर्यंत झाले आहे. धडगाव तालुक्यात त्याहीपेक्षा अल्प प्रतिसाद आहे. या तालुक्यातील लोकसंख्या दोन लाख ५० हजार ५७४ असून त्यापैकी १८ वर्षावरील एक लाख पाच हजार २४१ तर ४५ वर्षावरील ७५ हजार ६७३ असे एक लाख ८० हजार ९१४ जणांचे लसीकरण करण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठरविले आहे. त्यापैकी १२ हजार ४२९ म्हणजे जेमतेम ६.८ टक्के लसीकरण झाले आहे.
शिबिरांना प्रतिसाद
दुर्गम भागात आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरांपैकी राज्यपाल यांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावात सर्वाधिक म्हणजे ८३१ जणांनी लसीकरण केले. तर मोलगी, काठी, वेरी याठिकाणच्या शिबिरांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नर्मदा काठावरील भादल या गावात केवळ १२ जणांनी लसीकरण केले तर चिमलखेडीला ३५ जणांनी लसीकरण केले आहे.
दुर्गम भागात लसीकरणासाठी आव्हान असले तरी यंत्रणा मात्र प्रयत्न करून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्कलकुवा तालुक्यात चांगला प्रतिसाद आहे त्यामानाने धडगावमध्ये कमी उत्साह दिसून येत आहे. मात्र हळूहळू लोक लसीकरणाला राजी होत आहेत हे आशादायक चित्र आहे.
-डॉ.एन.डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार