बैल पोळा विशेष; सर्जाराजा हरवला आणि ट्रॅक्टर आला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:01+5:302021-09-06T04:35:01+5:30
ब्राह्मणपुरी : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असायचा. गावागावातील शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; परंतु काही ...

बैल पोळा विशेष; सर्जाराजा हरवला आणि ट्रॅक्टर आला...
ब्राह्मणपुरी : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असायचा. गावागावातील शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; परंतु काही वर्षापासून बैल सांभाळण्यापेक्षा यांत्रिकीकरणाकडे कल वाढला आहे.
शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांच्या बैलांची संख्या घटली. बैलांऐवजी घरासमोर आता ट्रॅक्टर दिसू लागले. काळाच्या ओघात सर्जा-राजा हरवला अन् ट्रॅक्टर आला, असे चित्र पाहायला मिळत आहे.
पूर्वी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांचे पूजन करून थाटामाटात मिरवणूक काढायचा. तेव्हा गावाच्या मंदिरासमोर जागा अपुरी पडायची. बैलांशिवाय शेती नसायची; पण आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आणि बैलजोड्या संभाळताना पोषणाचा खर्च विनाकारण वाढू लागल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागली आहे. दुसरीकडे बैलजोडीऐवजी दुभत्या गाई घेऊन त्या सांभाळण्याकडे कल वाढला. त्या पैशातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागल्याने बैलजोडी भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पोळ्याला बोटावर मोजता येतील एवढ्याच बैलजोड्या आहेत.
खर्च वाढल्याने सांभाळायचा प्रश्न
बैलांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. कमी क्षेत्रफळाची शेती असल्याने बैलजोडी सांभाळणे शक्य नाही. त्याऐवजी ट्रॅक्टरची शेती परवडत असल्याचे शेतकरी म्हणाले. तसेच १० वर्षापूर्वी आमच्या गावात घरोघरी बैलजोडी असायची. त्यानेच शेती व्हायची. पोळ्याला बैलजोडी दारात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटायचा. आता गावात १० ते १५ बैल आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
शेती मशागती वेळेवर होण्यास मदत
आधुनिक युगात यांत्रिकीकरणाने जागा घेतली असून, यांत्रिकीकरणामुळे शेती मशागती वेळेवर होत आहे. एका दिवसात जास्त प्रमाणात जमिनीची मशागत होत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.